Home News सिंधुदुर्ग जिल्हा ड्रग्स व मटका जुगार मुक्त करणार; पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्हा ड्रग्स व मटका जुगार मुक्त करणार; पालकमंत्री नितेश राणे

0
6

जिल्ह्यातील अवैध धंदे मुळापासून उखडून टाकण्याचा निर्धार; पक्ष, जात, धर्म न पाहता गुन्हेगारांवर होणार कडक कारवाई

सावंतवाडी, दि.०५: देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ज्याप्रमाणे मोठे प्रयत्न सुरू आहेत, त्याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दारू, ड्रग्स आणि मटका जुगार पूर्णपणे नष्ट करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला. या दृष्टीने प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, केवळ किरकोळ विक्री करणाऱ्यांवरच नाही, तर जिल्ह्यात या अवैध गोष्टी आणणाऱ्या आणि त्यांचा सप्लाय करणाऱ्या मुख्य सूत्रधारांवर कारवाई केली जात आहे. नुकतेच एका मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसांत सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्णपणे ड्रग्स आणि मटका जुगार मुक्त होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

गुन्हा करणारा व्यक्ती कोणत्याही विचारसरणीचा असो, तो केवळ एक गुन्हेगार असतो, असे स्पष्ट करत पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, अवैध धंदे, मटका, जुगार, गोवा बनावटीची दारू आणि बीफचा बेकायदेशीर व्यापार करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. कारवाई करताना संबंधित व्यक्तीचा पक्ष, झेंडा, जात किंवा धर्म अजिबात पाहिला जाणार नाही. अवैध धंदेमुक्त सिंधुदुर्ग करेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही आणि यासाठी कुठल्याही टोकाला जाण्याची आपली तयारी आहे. गेल्या एका वर्षात गांजा ओढणाऱ्यांपासून ते थेट त्याची विक्री करणाऱ्यांपर्यंत अनेकांवर कडक कारवाई झाली असून, याचे सर्व धागेदोरे प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. देवेंद्र फडणवीसांचे सरकार असताना कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ देणार नाही, अशी खात्रीही त्यांनी दिली. नुकताच दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या बंधूवर झालेल्या चाकू हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, तेथील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन कडक कारवाईचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील विकास प्रकल्पांविषयी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणताही अणूऊर्जा प्रकल्प होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. पर्यावरणाला हानी पोहोचवणारा कोणताही प्रकल्प जिल्ह्यात आणला जाणार नाही, हीच सरकारची भूमिका आहे. मात्र, केवळ राणे द्वेषापोटी काही घटकांकडून होणारा विरोध हा जिल्ह्यातील तरुणांचे भविष्य अंधारात टाकणारा आहे. रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेल्या तरुणांना पुन्हा मातृभूमीत आणणे आवश्यक असून, देवगड आणि सिंधुदुर्गची प्रतिमा आंदोलनांमुळे खराब होऊ नये, जेणेकरून गुंतवणूकदार येथे येण्यास सकारात्मक राहतील, असे आवाहन त्यांनी केले. देवगडमधील तरुण अत्यंत जागरूक असून, या जागरूक तरुणांच्या बळावरच विकास साधला जाईल आणि त्यांना स्थानिक पातळीवरच नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असा शब्दही त्यांनी दिला.

सावंतवाडी शहराला आदर्श शहर बनवण्यासाठी १८ प्रकारच्या सुविधा देताना दर्जेदार क्रीडा संकुल आणि चांगला जिमखाना उभारण्यावर आमचा प्रयत्न आहे. आजची मुलं मोबाईलमध्ये अडकली असून त्यांना खेळाकडे वळवण्यासाठी आमचा मानस असून नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोंसले यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. निधी देण्यासाठी आपण खंबीरपणे पाठीशी असून सावंतवाडी शहराला पुर्णवेळ मुख्याधिकारी लवकरच मिळेल. सध्या सिंधुदुर्ग जिल्हा ५५ टक्के शासकीय क्षमतेवर काम करत असून बरीच रिक्त पदे भरण्यासाठी सरकार सज्ज आहे.

काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास ‘त्या’ ठेकेदाराला सोडणार नाही!
५७ कोटींच्या नळपाणी योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासह ते दर्जेदार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कामाच्या दर्जात कोणतीही कसूर झालेली दिसली तर आम्ही कोणालाही सोडणार नाही. आमचे कुणाशीही लागेबांधे नसून अशा ठेकेदारांना थेट ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची तयारी आमची आहे. कामात क्वालिटी न ठेवली गेल्यास त्यावर कडक निर्णय घेतला जाईल. या संदर्भात मंत्रालयात एक विशेष बैठक बोलावली असून संबंधित ठेकेदारासमक्ष मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि जिल्हाधिकारी मिळून या कामाचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला. या प्रसंगी नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोंसले, सभापती दिपाली भालेकर, मोहिनी मडगावकर, निलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, दिलीप भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here