सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर आणि उपसरपंचांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट; संमतीशिवाय मीटर बसवल्यास तीव्र आंदोलनाचा पवित्रा
सावंतवाडी,दि.१८: राज्यभर सध्या सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर बांदा शहरातही नागरिकांमध्ये विविध शंका-कुशंका आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर बांद्यातील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये एक महत्त्वाची चर्चा पार पडली. यावेळी ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय शहरात स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नयेत, अशी ठाम भूमिका स्थानिक नागरिक आणि प्रतिनिधींनी महावितरण प्रशासनासमोर मांडली.
या चर्चेदरम्यान भाजप बांदा मंडल उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर, बांदा उपसरपंच रत्नाकर आगलावे, राकेश केसरकर, हेमंत दाभोलकर आणि गंगाराम परब यांनी स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या तीव्र शंका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच, ग्राहकांची पूर्वपरवानगी किंवा स्पष्ट संमती न घेता जर महावितरणने सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न केला, तर बांद्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशाराही या शिष्टमंडळाने दिला.
नागरिकांचा आणि लोकप्रतिनिधींचा आक्रमक पवित्रा पाहून महावितरणच्या बांदा शाखेचे उप-अभियंता साहील टाके यांनी उपस्थित नागरिकांना आश्वस्त केले. कोणत्याही ग्राहकाच्या संमतीशिवाय बांद्यात स्मार्ट मीटर बसविले जाणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच स्मार्ट मीटर संदर्भातील सर्व शंका आणि गैरसमज दूर करण्यासाठी महावितरणकडून आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम आधी दूर करणे गरजेचे असून त्यासाठी महावितरणने तातडीने जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी गुरु कल्याणकर यांनी यावेळी केली. ग्राहकांचा पूर्ण विश्वास संपादन करूनच कोणतीही कार्यवाही करण्यात यावी, अशी एकमुखी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. एकूणच या संपूर्ण प्रकारावरून स्मार्ट मीटरच्या मुद्द्याबाबत बांद्यातील नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी कमालीचे सजग झाल्याचे दिसून येत असून, ग्राहकांच्या हिताशी कोणतीही तडजोड होणार नाही, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



