Home News ‘बोले तैसा चाले…’ भाजपा युवा नेते विक्रांत सावंत यांनी अवघ्या दुसऱ्याच दिवशी...

‘बोले तैसा चाले…’ भाजपा युवा नेते विक्रांत सावंत यांनी अवघ्या दुसऱ्याच दिवशी पाळला शब्द; चराठा शाळेला इन्व्हर्टर सुपूर्द

0
3

वीज समस्येवर तत्परतेने तोडगा; विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव

सावंतवाडी,दि.१८: “आपल्या शाळेची गरज ओळखून शाळेला आवश्यक क्षमतेचा इन्व्हर्टर पुढील आठ दिवसांत उपलब्ध करून दिला जाईल,” अशी ग्वाही माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य तथा भाजपा युवा नेते विक्रांत सावंत यांनी दिली होती. आपल्या या शब्दाला जागत त्यांनी अवघ्या दुसऱ्याच दिवशी चराठा येथील पी. एम. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेला इन्व्हर्टर उपलब्ध करून दिला आहे. विक्रांत सावंत यांच्या या गतिमान कार्यपद्धतीमुळे “बोले तैसा चाले…” या उक्तीची प्रचिती पुन्हा एकदा चराठा ग्रामस्थांना आली आहे.

नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका शालेय कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या विविध सुविधांबाबत सविस्तर चर्चा झाली होती. यावेळी शाळेत आधुनिक शैक्षणिक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असला, तरी भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे दैनंदिन अध्यापन प्रक्रियेत मोठे अडथळे निर्माण होत असल्याची गंभीर समस्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकांनी विक्रांत सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली होती. वीज नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत असल्याचे पाहून सावंत यांनी संवेदनशीलतेने यावर तात्काळ मार्ग काढण्याचे ठरवले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी येत्या आठ दिवसांत शाळेला स्वखर्चाने किंवा निधीतून इन्व्हर्टर देण्याची घोषणा केली होती. मात्र, केवळ घोषणा करून न थांबता आपल्या कृतीतून तत्परतेने वचनपूर्ती करत त्यांनी थेट दुसऱ्याच दिवशी शाळेत इन्व्हर्टर सुपूर्द केला. राजकीय नेत्यांच्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी जिथे महिने न महिने वाट पाहावी लागते, तिथे अवघ्या २४ तासांत शब्द पूर्ण झाल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकंदरीतच, शिक्षण क्षेत्रातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विक्रांत सावंत हे सातत्याने प्रयत्नशील असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक बाबतीत आपण खंबीरपणे पाठीशी उभे राहू, ही त्यांची भूमिका यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

या महत्त्वपूर्ण मदतीबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षकवर्ग आणि चराठा ग्रामस्थांनी विक्रांत सावंत यांचे विशेष आभार मानत त्यांच्या या तत्परतेचे मनापासून कौतुक केले. “केवळ घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कृती महत्त्वाची असते, आणि सावंत यांनी ती करून दाखवली आहे. दिलेला शब्द वेळेआधी पाळणारा असाच लोकप्रतिनिधी आजच्या काळाची गरज आहे,” अशी कौतुकास्पद भावना यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here