Home News वृक्ष संवर्धन व जतन ही काळाची गरज; कुडाळमध्ये ५ वे राष्ट्रीय पर्यावरण...

वृक्ष संवर्धन व जतन ही काळाची गरज; कुडाळमध्ये ५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन उत्साहात संपन्न

0
2

‘फोटोपुरते वृक्षारोपण नको, झाडे जगवण्याची जबाबदारी घ्या’ – आमदार दीपक केसरकर यांचे आवाहन

कुडाळ, दि.११: वृक्ष लागवड करून केवळ फोटो काढण्यापुरते मर्यादित न राहता, लावलेले प्रत्येक झाड जगवणे आणि त्याचे संवर्धन करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. निसर्गाचे चक्र बिघडल्याने आज आपल्यासमोर हवामान बदलाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. या संकटावर मात करण्यासाठी शाश्वत विकास आणि पर्यावरण रक्षण यांचा समतोल राखणे अनिवार्य आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड दत्तक घेऊन ते मोठे होईपर्यंत जोपासावे, तरच आपली वसुंधरा सुरक्षित राहील, असे प्रतिपादन माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले.

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने आयोजित ‘५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन २०२६’ कुडाळ येथील ‘जय वासुदेवानंद हॉल’ मध्ये रविवारी मोठ्या उत्साहात पार पडले. ३० एप्रिल १९९७ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेल्या ‘पर्यटन जिल्हा’ या बहुमानाचा जागर करण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आ. केसरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुयोग धस, देवगड नगरपंचायत सभापती तन्वी चांदोस्कर, राष्ट्रीय महिला सचिव आशिया रिझवी, राष्ट्रीय खजिनदार अपर्णा धस, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, गोवा राज्य अध्यक्ष जोवेल डिसिल्व्हा यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविताना सुयोग धस यांनी पर्यावरण चळवळीच्या विस्तारावर भर दिला, तर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त केली. निसर्ग टिकला तरच मानव टिकेल, असे सांगत त्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर आणि प्रदूषण रोखण्याचे आवाहन केले.

भव्य वृक्षदिंडी आणि प्रदर्शनांचे आकर्षण
संमेलनाची सुरुवात सकाळी ७:३० वाजता कुडाळ पोलीस स्टेशन ते संमेलन स्थळ अशा भव्य ‘वृक्षदिंडी’ने झाली. वृक्षदिंडी प्रमुख संजय पिळणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या दिंडीचा प्रारंभ करण्यात आला. संमेलनाच्या मुख्य सोहळ्यात शिवकालीन साहित्य प्रदर्शन, गडकिल्ले तैलचित्र प्रदर्शन आणि निसर्ग फोटो गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये गणेश नाईक, पिटर शेरॉन आणि प्रकाश कदम यांच्या कलाकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी ऋतूजा गवस यांच्या स्मरणिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले.

विविध क्षेत्रातील धन्वंतरींचा सन्मान
या संमेलनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या व्यक्तींचा विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये तब्बल ७७ वेळा रक्तदान करणारे सुधीर पराडकर, पत्रकार निलेश मोरजकार, सौ. शामल मांजरेकर-पिळणकर या रक्तदात्यांसह, आपत्कालीन परिस्थितीत गर्भवती महिलेचे प्राण वाचवणारे डॉ. पांचाळ व १०८ चालक साईसिद्धी मेस्त्री यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सर्पमित्र प्रसन्ना गंगावणे, कार्मिस अल्मेडा व ज्ञानेश्वर रेडकर यांनाही त्यांच्या कार्याबद्दल गौरविण्यात आले.

या संमेलनात महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील पर्यावरण प्रेमी, तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पिळणकर यांनी केले, सूत्रसंचालन ऋतूजा गवस व संजय पिळणकर यांनी केले, तर आभार बापू परब यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here