गॅस पाईपलाईन आणि नळ पाणी योजनेच्या कामामुळे जलवाहिन्या फुटल्या; जिल्हाप्रमुख संजू परब
सावंतवाडी,दि.२२: सावंतवाडी शहरात सध्या गॅस पाईपलाईन आणि नळ पाणी योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, मात्र या कामामुळे शहरातील अनेक भागांतील जुन्या पाण्याच्या पाईपलाईन फुटल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. ऐन उन्हाळ्यात शहरवासीयांना पाण्यापासून वंचित राहावे लागत असून, ही परिस्थिती तातडीने न सुधारल्यास ४ दिवसांत नगरपालिकेवर भव्य ‘आक्रोश मोर्चा’ काढला जाईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे. येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संजू परब यांनी प्रशासनावर ताशेरे ओढताना सांगितले की, अनेक नागरिकांनी तक्रारी करूनही प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. नगराध्यक्षांनी या प्रकरणी वेळीच लक्ष देणे आवश्यक होते, मात्र केवळ पाणी पुरवठ्याची वेळ बदलून हा प्रश्न सुटणार नाही. सद्यस्थिती पाहता पावसाळ्यातही हीच बिकट अवस्था राहण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. जर ४ दिवसांत फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करून सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही, तर सर्व नागरिकांसह हातामध्ये घागरी घेऊन नगरपालिकेवर धडक दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील काही प्रभागांमध्ये गेल्या चार-चार दिवसांपासून थेंबभरही पाणी आलेले नाही, तर ज्या भागात पाणी येत आहे तिथे गढूळ आणि जंतूयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेचे काम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्हावे, अशी मागणी शिवसेनेने यापूर्वीच सभागृहात केली होती, परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नगरसेविका ॲड. निता सावंत-कविटकर यांनी केला. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन ढिम्म हलत नसल्याने आता महिलांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेला नगरसेवक बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, ॲड. सायली दुभाषी, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, क्लेटस फर्नांडिस, अर्चित पोकळे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
5204363867982620270-1024x791.jpg)



