Home News इंधन टंचाईमुळे सावंतवाडीत जनजीवन विस्कळीत; रुपेश राऊळ यांचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना...

इंधन टंचाईमुळे सावंतवाडीत जनजीवन विस्कळीत; रुपेश राऊळ यांचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन

0
3

सावंतवाडी,दि.२७: जिल्ह्यात सध्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून, यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकरी आणि मच्छिमार हवालदिल झाले आहेत. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. शासनाकडून इंधन टंचाई नसल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना चार-चार दिवस रांगेत उभे राहावे लागत आहे, तर दुसरीकडे पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध नसल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका आंबा आणि काजू बागायतदारांना बसत आहे. वाहतुकीची सोय उपलब्ध नसल्याने तयार पीक शेतातच कुजत असून बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मच्छिमारांनाही नौकांवरील इंधनाअभावी संकटाचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, सामान्य जनता या समस्येशी झुंजत असताना मंत्री आणि शासकीय अधिकारी मात्र गाड्यांचा ताफा घेऊन फिरत असल्याची टीका विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका किंवा साधी गाडीही उपलब्ध होत नसल्याने परिस्थिती अत्यंत भयावह बनली आहे.

या पार्श्वभूमीवर, बागायतदार आणि मच्छिमारांना मुबलक इंधन पुरवठा करावा, सामान्य नागरिकांना लागणारे शासकीय दाखले ग्रामपंचायत स्तरावरच उपलब्ध करून द्यावेत आणि मंत्र्यांच्या दौऱ्यातील गाड्यांची संख्या कमी करून इंधनाची बचत करावी, अशा मागण्या ठाकरे गटाने केल्या आहेत. तसेच रुग्णवाहिकांसाठी राखीव इंधन साठा ठेवून नागरिकांना गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी रुपेश राऊळ यांच्यासह चंद्रकांत कासार, विनोद शेटकर, विनोद ठाकूर, श्री काजरेकर, पुरुषोत्तम राऊळ आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here