सावंतवाडी, दि.०४: मी कोणाच्या विरोधात नसून मी हुकूमशाहीच्या विरोधात आहे. मी जनसंवाद यात्रा काढली आहे व तिची सुरुवात बांद्या पासून चांद्यापर्यंत करीत आहे. राज्य सरकारमध्ये आता गॅंगवॉर सुरू झाले आहे. हे मिंदे सरकार असून त्यांच्यातील मोठा गद्दार येथे आहे.तो डबल गद्दार आहे.
ते पंधरा पंधरा दिवसांनी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जात असतात. मात्र साईबाबांनी सांगितलेली श्रद्धा आणि सबुरी यातील एकही गुण त्यांच्याकडे नाही. ते श्रद्धा कधीच ठेवू शकत नाहीत व सबुरी त्यांच्याकडे नाही, म्हणूनच त्यांनी गद्दारी केली. आता या गद्दारांना ठेचून टाका. यांना पुन्हा निवडून देऊ नका. असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने सावंतवाडी गांधी चौक येथे आयोजित जाहीर सभेत उद्धव ठाकरे आज बोलत होते.
यावेळी बोलताना ठाकरे पुढे म्हणाले,राज्यातील भाजपच्या आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. पण त्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले आहे की, शिंदे मुख्यमंत्री राज्यात गुंडांची पैदास निर्माण करत आहेत, शिंदे गुंड बनवीत आहेत. शिवसेना फोडून तुम्ही काय मिळवले? मी आजारी असताना रात्रीचे वेश बदलून फिरणाऱ्यांना आता पाव उपमुख्यमंत्री बनावे लागले. तूम्ही काही केले तरी शिवसेना संपणार नाही. माझी शिवसेना आहे तेथेच आहे. माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरले, पण माझे कार्यकर्ते आहेत तेथेच आहेत. कार्यकर्त्यांचे हे कवच मला वडिलोपार्जित मिळाले आहे आणि त्यामुळे मी लढत आहे व लढत रहाणार. वडिलोपार्जित कवच जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत गद्दारांना गाढण्याची ताकद शिवसेनेत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत ती आम्ही दाखवून देऊ. येणाऱ्या निवडणुकीत जर या गद्दारांना गाडले नाही तर पुन्हा प्रजासत्ताक दिन येईल असे वाटत नाही. येथे हुकुमशाहीला सुरुवात होईल असे ठाकरे म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, माजी मंत्री तथा आमदार भास्कर जाधव, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, संपर्क प्रमुख शैलेश परब, सौ. जानवी सावंत, गौरीशंकर खोत, सुशांत नाईक, बाळू परब, राजन नाईक, मायकल डिसोजा, अतुल रावराणे, बाळ गावडे, संदेश पारकर, संजय पडते, बाबुराव धुरी, सतीश सावंत आदी शिवसेनेची नेते मंडळी उपस्थित होती.