कायमस्वरूपी वायरमन अभावी तासनतास बत्ती गूल; ऐन पर्यटन हंगामात हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान, धरणे आंदोलनाचा इशारा
सावंतवाडी, दि.०१: जागतिक वारसा स्थळ आणि महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली परिसरात महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिक पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून महावितरणची ३३ केव्ही (KV) ची वीज वाहिनी आंबोली सब-स्टेशनला येते आणि तिथून ११ केव्हीच्या वाहिनीद्वारे आंबोली, गेळे आणि चौकूळ या तिन्ही गावांना वीजपुरवठा केला जातो. तिथून पुढे विविध ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून प्रत्येक वाडी, घर आणि हॉटेल्सना वीज पुरवली जाते. मात्र, सद्यस्थितीत महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे या संपूर्ण भागातील वीज व्यवस्था कोलमडली असल्याचा गंभीर आरोप आंबोलीच्या माजी सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री पालेकर यांनी केला आहे.
सध्या आंबोली, गेळे आणि चौकूळ या तीन मोठ्या गावांमध्ये केवळ चार कंत्राटी (कॉन्ट्रॅक्ट बेस) कर्मचारी कार्यरत आहेत. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हे कर्मचारी आपापल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. परंतु, नियमानुसार जेव्हा एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होतो किंवा मुख्य वीज वाहिनी तुटते, तेव्हा दुरुस्तीचे काम करण्यासाठी आंबोली सब-स्टेशनवरून जे आवश्यक ‘परमिट’ घ्यावे लागते, ते कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्याचा अधिकार महावितरणकडे नाही. परिणामी, जे दुरुस्तीचे काम अवघ्या एका तासात पूर्ण होऊ शकते, त्यासाठी ‘परमिट’ न मिळाल्यामुळे तब्बल एक-एक दिवस किंवा त्याहून अधिक काळ वीज बंद ठेवावी लागत आहे.
सध्या आंबोलीत मान्सून पर्यटन हंगाम मोठ्या दिमाखात सुरू आहे. महाराष्ट्रभरासह कर्नाटक, गोवा आणि इतर राज्यांतून हजारो पर्यटक येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी दाखल होत आहेत. मात्र, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये तासनतास वीज नसल्याने पर्यटकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. वीज नसल्यामुळे पर्यटक आपले बुकिंग ऐनवेळी रद्द करत आहेत, तर मुक्कामाला असलेले पर्यटक तीव्र नाराजी व्यक्त करून निघून जात आहेत. एवढेच नव्हे तर, सततच्या वीजखंडामुळे हॉटेल्समधील साठवून ठेवलेले अन्नपदार्थ खराब होऊन व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
आंबोलीतील पर्यटन व्यावसायिकांनी अत्यंत कष्टाने आणि स्वतःचे भांडवल उभारून हे व्यवसाय उभे केले आहेत. परंतु, महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे आज त्यांच्यावर देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर, आंबोली, गेळे आणि चौकूळ या तिन्ही गावांत तत्काळ ‘परमनंट वायरमन’ उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी सावित्री पालेकर यांनी केली आहे. परमनंट वायरमन उपलब्ध झाल्यास त्याला दुरुस्तीसाठी लागणारे परमिट त्वरित मिळेल आणि विजेची समस्या मार्गी लागेल.
या गंभीर समस्येबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी आणि मागण्या करूनही अधिकारी वर्ग कोणतीही दखल घेताना दिसत नाही. महावितरणच्या या बेफिकीर वृत्तीमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटन व्यावसायिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाने त्वरित यावर तोडगा न काढल्यास आंबोली, गेळे व चौकूळमधील जनता आणि व्यावसायिक महावितरणच्या कार्यालयावर भव्य धरणे आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. तसेच आगामी ग्रामसभेत आणि आमसभेत या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल आणि वीज खंडित झाल्यामुळे व्यावसायिकांचे जे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे, त्याच्या भरपाईची मागणीही महावितरणकडे केली जाईल, असा इशारा सावित्री पालेकर यांनी दिला आहे.



