Home News मोदींच्या नेतृत्वाखाली तुष्टीकरणाचा अंत आणि हिंदू अस्मितेचा उदय; पालकमंत्री नितेश राणे यांनी...

मोदींच्या नेतृत्वाखाली तुष्टीकरणाचा अंत आणि हिंदू अस्मितेचा उदय; पालकमंत्री नितेश राणे यांनी मांडला १२ वर्षांच्या परिवर्तनाचा लेखाजोखा

0
3

‘राष्ट्र प्रथम’ विचारामुळेच भारत आज जागतिक महाशक्ती; कणकवलीतील पत्रकार परिषदेत काँग्रेसवर कडाडून टीका

कणकवली, दि.१५: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व आणि यशस्वी कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या निर्णय आणि परिवर्तनाचा गौरवशाली लेखाजोखा मांडला. २०१४ पूर्वी देशात असलेल्या असुरक्षिततेच्या वातावरणातून मोदींनी देशाला बाहेर काढत जागतिक पातळीवर सर्वात सुरक्षित राष्ट्र म्हणून नवी ओळख मिळवून दिली आहे. सर्वाधिक काळ पंतप्रधान होण्याचा मान मिळवणाऱ्या मोदींच्या नेतृत्वाखाली भारत आता अमेरिका आणि चीननंतर तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक व सामरिक महाशक्ती बनत असल्याचा सार्थ अभिमान त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी काँग्रेसच्या जुन्या राजकारणावर तीव्र शब्दांत प्रहार केला. २०१४ पूर्वीच्या काळात केवळ ‘वोट बँक’ सांभाळण्यासाठी अल्पसंख्याकांचे लांगूलचालन केले जात होते, असा आरोप त्यांनी केला. त्या काळात हिंदू समाजावर अन्याय होत होता, सणांवर बंदी घातली जात होती आणि वफ्फ कायद्यासारख्या जाचक नियमांमुळे हिंदूंच्या जमिनी असुरक्षित होत्या. देशात सतत अतिरेकी कारवाया आणि असुरक्षिततेची भावना होती, परंतु मोदींच्या आगमनाने ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार केंद्रस्थानी आला आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाचा कायमचा अंत झाला, असा दावा त्यांनी केला.

गेल्या १२ वर्षांतील धार्मिक पुनरुत्थानावर भाष्य करताना राणे म्हणाले की, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला अयोध्येतील भव्य राम मंदिराचा विषय मोदी सरकारने कोणत्याही दंगलीविना आणि शांततेत मार्गी लावला. काशी विश्वनाथ आणि उज्जैन कॉरिडॉरचा विकास करून धार्मिक पर्यटनाला मोठी चालना देण्यात आली. पंतप्रधान मोदी केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही आपली हिंदू ओळख आणि सनातन धर्माचा अभिमान बाळगून वावरतात, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे. धार्मिक स्थळांना सुरक्षा कवच देतानाच हिंदू समाजाला त्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी मोदी सरकारने ऐतिहासिक पावले उचलली आहेत.

देशाच्या सुरक्षेबाबत बोलताना नितेश राणे यांनी ठामपणे सांगितले की, आज पाकिस्तान किंवा कोणत्याही जिहादी संघटनेची भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत उरलेली नाही. जर कोणी खोडसाळपणा केला, तर त्याला ‘ऑपरेशन सिंधूर’ सारख्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले जाते. आज भारत जगातील सर्वात सुरक्षित देश म्हणून ओळखला जातो, हेच मोदींचे सर्वात मोठे योगदान आहे. या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा संयोजक रणजित देसाई, संदीप साटम, निसार शेख, मिलिंद मेस्त्री, भाई सावंत, संजय वेंगुर्लेकर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here