गावात सलोखा व शांतता टिकवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा व्यक्त केला विश्वास
सावंतवाडी,दि.०९: ओटवणे येथे पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सावंतवाडी पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ. उत्कर्षा उमेश गावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. गावातील सामाजिक एकोपा अधिक दृढ करणे आणि प्रलंबित वाद सामंजस्याने मिटवणे, या हेतूने ही निवड अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
गावातील नागरिकांमध्ये परस्परांबद्दल सलोखा, शांतता व सामाजिक वातावरण सुदृढ ठेवण्यासोबतच विविध छोटे-मोठे तंटे न्यायालयात जाण्यापूर्वीच आपापसात सोडवण्याची जबाबदारी तंटामुक्ती समितीवर असते. या पार्श्वभूमीवर उत्कर्षा गावकर यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील अनुभवाचा फायदा गावाला होईल, असा सूर ग्रामसभेत उमटला. त्यांच्या निवडीची घोषणा होताच उपस्थित ग्रामस्थ आणि सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे मनापासून स्वागत केले.

आपल्या निवडोत्तर भाषणात सौ. उत्कर्षा गावकर यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. “गावातील कोणतेही वाद-विवाद सामोपचाराने आणि सामंजस्याने सोडवून ओटवणे गावात अखंड शांतता, बंधुभाव व एकोपा टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्व घटकांना सोबत घेऊन प्रामाणिक प्रयत्न करू,” असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी ओटवणे ग्रामस्थांच्या वतीने सौ. गावकर यांचा नागरी सत्कार करून त्यांना पुढील सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.



