Home News भाजपचा दिलासादायक निर्णय! सिंधुदुर्गातील ‘त्या’ १३ पदाधिकाऱ्यांचे निलंबन मागे

भाजपचा दिलासादायक निर्णय! सिंधुदुर्गातील ‘त्या’ १३ पदाधिकाऱ्यांचे निलंबन मागे

0
4

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार पुन्हा एकदा पक्षात संधी

सिंधुदुर्ग,दि.०९: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांदरम्यान पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या १३ पदाधिकाऱ्यांना अखेर पक्षाने दिलासा दिला आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांचे निलंबन तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले असून, त्यांना पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होऊन काम करण्याची संधी देण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या काळात काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या धोरणांविरोधात व पक्षशिस्तीच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे शिस्तभंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, निवडणूक पार पडल्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपल्याकडून झालेली चूक लक्षात आल्याचे मान्य करत पक्षाकडे निलंबन रद्द करण्यासाठी विनंती अर्ज केले होते.

या अर्जांची दखल घेत पक्ष पातळीवर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर पक्षाच्या शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार या १३ पदाधिकाऱ्यांना पुन्हा पक्षकार्यात संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

निलंबन मागे घेण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये नितीन एकनाथ राऊळ, डायगो (मायकल) फ्रान्सिस डिसोजा, सुजाता अजित पडवळ, जितेंद्र पांडुरंग गावकर, शर्वाणी शेखर गावकर, स्वागत रघुवीर नाटेकर, योगेश अशोक केणी, उल्हास उत्तम परब, स्नेहल संदीप नेमळेकर, साक्षी संदीप नाईक, सुप्रिया शैलेश नाईक, प्रवीण नारायण गवस आणि अनिरुद्ध फाटक यांचा समावेश आहे.

या सर्व १३ पदाधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात आल्याने त्यांना पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होऊन भाजपच्या संघटन वाढीसाठी काम करण्याची संधी मिळणार आहे. भाजपच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here