Home News आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचाच विजयध्वज फडकणार : ना. नितेश राणे

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचाच विजयध्वज फडकणार : ना. नितेश राणे

0
3

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपला राज्यात नेहमीच पहिल्या तीन क्रमांकांत ठेवणार; अवैध धंदे आणि पक्षाची प्रतिमा मलीन करणाऱ्यांची गय नाही

सावंतवाडी,दि.०९: सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे संघटन अत्यंत मजबूत असून, आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचाच विजयध्वज फडकणार आहे. विरोधकांकडे सध्या केवळ टीका करण्याचे काम उरले असून, निवडणुकांच्या मैदानात ते आमच्यासमोर टिकू शकत नाहीत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आपापसातील संवाद आणि विश्वास अधिक दृढ करून भाजपचे संघटन गावपातळीवर अधिक मजबूत करावे, असे रोखठोक आवाहन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या सावंतवाडी येथे आयोजित कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, भाजपचे वरिष्ठ नेते आ. योगेश सागर यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले की, अलीकडे झालेल्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा आहेत आणि समाजात कोणता संदेश घेऊन जायचा आहे, याचे स्पष्ट दर्शन घडवले आहे. त्या विचारांचा अंगीकार करून सर्व कार्यकर्त्यांनी समाजात काम केले पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात भाजप कार्यकारिणीच्या ताकदीमुळेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वाधिक जागा बिनविरोध निवडून आणण्याचा पराक्रम शक्य झाला आहे. येणाऱ्या जिल्हा बँक, ग्रामपंचायत आणि इतर निवडणुकांमध्येही उत्तम समन्वय राखून प्रत्येक सहकाऱ्याला ताकद देण्याचे काम केले जाईल. निवडणुकीत पक्षविरोधात काम करणाऱ्या किंवा आपापसांतील मतभेदांमुळे नुकसान होणाऱ्या बाबी टाळल्या पाहिजेत. पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि पक्षचिन्ह याशी प्रामाणिक राहून काम केल्यास जिल्ह्यातील एकही राजकीय पक्ष भाजपसमोर आव्हान उभे करू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या काळात राबवण्यात येणाऱ्या सेवा पंधरवड्याचे सर्व कार्यक्रम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी दिले. ‘मन की बात’सारखे संघटनात्मक उपक्रम आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार हे ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ची भक्कम पायाभरणी करत आहे. शेतकरी कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदान, मच्छीमारांसाठीच्या योजना, पर्यटन विकास आणि रोजगाराच्या नवीन संधी या सर्व बाबी लोकांसमोर प्रभावीपणे मांडणे ही कार्यकर्त्यांची मुख्य जबाबदारी आहे. शिरोडा येथे येत असलेले नवीन पंचतारांकित हॉटेल आणि तळवणे येथे सुरू करण्यात आलेला जहाज बांधणी प्रकल्प यांसारख्या विकास प्रकल्पांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होत असून, परराज्यात गेलेला कोकणी तरुण पुन्हा आपल्या मातीकडे परतत आहे, हे ठणकावून सांगण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपचे सर्व वरिष्ठ नेतृत्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे मिळालेल्या अधिकारांचा आणि डीपीडीसीच्या निधीचा उपयोग केवळ जनसेवेसाठी आणि संघटन वाढवण्यासाठीच झाला पाहिजे. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हिंदुत्ववादी विचारांशी आणि पक्षाच्या ध्येयधोरणांशी प्रामाणिक राहून काम करेल आणि सिंधुदुर्ग जिल्हा भाजपला राज्यात नेहमीच पहिल्या तीन क्रमांकांत ठेवेल, असा पुनरुच्चार ना. नितेश राणे यांनी केला.

आपल्या भाषणात पालकमंत्र्यांनी अवैध धंदे आणि नशामुक्त सिंधुदुर्ग या मुद्द्यावर अत्यंत कडक भूमिका घेतली. सावंतवाडी व आसपासच्या परिसरात सुरू असलेले मटका, जुगार, दारू व ड्रग्जसारखे बेकायदेशीर धंदे अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. पक्षाचे नाव किंवा पदाचा वापर करून कोणीही अशा चुकीच्या गोष्टींमध्ये सहभागी होत असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लावणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही, असा स्पष्ट व सडेतोड इशारा त्यांनी या बैठकीत दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here