Site icon Kokandarshan

मराठा समाजाने सनदशीर मार्गाने आपला लढा सुरू ठेवावा..

सावंतवाडी तालुका सकल मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे यांचे आवाहन

सावंतवाडी,दि.३१: मराठा समाजाने कुठेही विचलित न होता, जाळपोळ ,गाड्या फोडणे, आधीसारखे प्रकार करू नयेत असे आवाहन खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे, हे प्रकार असेच चालू राहिल्यास ते आपल्या उपोषणाबाबत मोठा निर्णय घेतील, त्यामुळे मराठा समाजाने सनदशीर मार्गाने आपला लढा सुरू ठेवावा, मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी काही विघ्न संतोषी माणसे असे प्रकार करू शकतात त्याला आपण बळी पडू नये असे आवाहन सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे यांनी केले आहे.
मनोज जरंगे पाटील यांनी सर्व मराठा समाजाला शांततेने लढा देण्याचे आवाहन केले आहे, कुठेही जाळपोळ ,हिंसाचार ,घडणार नाही याची दक्षता प्रत्येक मराठा समाजा बांधवांनी घ्यायला हवी, सत्ताधारी पण असे प्रकार करुन ते मराठ्यांच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे रात्र वैऱ्याची आहे, मराठा समाजाने सावधपणे पावले उचलावीत व आपल्या न्याय्य हक्कासाठी लढा सुरू ठेवावा असे आवाहन केले आहे.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत व आंदोलनाबाबत वेगवेगळ्या अफवा उठत आहेत, मात्र या अफवांवर मराठा समाजाने विश्वास न ठेवता संयमाने आपला लढा सुरू ठेवावा असे आवाहन सिताराम गावडे यांनी केले आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version