Site icon Kokandarshan

आंबोली घाटात सापडलेल्या त्या युवकाच्या मृत्यूचे गुड लवकरच समोर आणणार…

..त्या दृष्टीने तपासाची सूत्रे फिरवण्यात येणार…पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी

सावंतवाडी,दि.२१ : आंबोली येथील खोलदरीत कोसळलेला मृतदेह बाहेर काढण्यास सावंतवाडी पोलिसांना यश आले आहे. मात्र तो युवक कोण, कुठून आला होता हे शोधणे पोलिसांसमोर आव्हान आहे. दोन दिवसापूर्वी हा प्रकार घडला, असावा असा अंदाज पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान त्या अज्ञात व्यक्तीची आत्महत्या की, घातपात हे मात्र शवविच्छेदनानंतर कळणार आहे. परंतु तूर्तास तरी त्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आज सावंतवाडी व आंबोली पोलिसांच्या टीमसह रेस्क्यू टीमच्या मदतीने
सकाळी आठ वाजल्यापासून मदत कार्य सुरू करण्यात आले.
आंबोली रेस्क्यू टीमच्या साह्याने तेथील पोलीस सुरज पाटील, दत्ता देसाई, मनीष शिंदे, दीपक शिंदे आदी सहकारी खोल दरीत उतरले. यावेळी झुला करून दरीत असलेला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. उन्हात राहिल्यामुळे शरीरावरील त्वचा खराब झाली आहे तुर्तास तरी पडल्याची खुण वगळता अंगावर कोणत्याही जखमा नाहीत. त्यामुळे घातपाताचा संशय नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे. तो मृतदेह सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे. त्या ठिकाणी हा मृत युवक नेमका कुठचा, कशासाठी आला होता याचा तपास करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने तपासाची सूत्रे फिरवण्यात येणार आहे, असे पोलिस निरिक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले.

Exit mobile version