Site icon Kokandarshan

विवाह नोंदणी दाखल्यावर माहेरच्या व सासरच्या दोन्ही नावांचा करा उल्लेख; ठाकरे शिवसेनेचे रूपेश राऊळ यांची जिल्हा परिषदेकडे मागणी

गॅझेट प्रक्रियेतील आर्थिक भुर्दंड आणि वेळ वाचवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने त्वरित आदेश देण्याचे निवेदन

सावंतवाडी, दि.०८: विवाह नोंदणी करताना ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये महिलांच्या केवळ लग्नानंतरच्या (सासरच्या) नव्या नावाचीच नोंद केली जाते. मात्र, महिलांची शैक्षणिक व इतर सर्व महत्त्वाची कागदपत्रे माहेरच्या नावाने असल्यामुळे पुढे नाव बदलासाठी त्यांना गॅझेट (राजपत्र) करावे लागते. यामध्ये महिलांचा मोठा वेळ आणि पैसा वाया जात असून नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींनी विवाह नोंदणी दाखल्यावर मुलीचे लग्नापूर्वीचे (माहेरचे) आणि लग्नानंतरचे अशा दोन्ही नावांची नोंद करावी, असे स्पष्ट आदेश जिल्हा परिषदेने द्यावेत, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी केली आहे.

या संदर्भात राऊळ यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) जयप्रकाश परब यांच्याशी संवाद साधताना राऊळ म्हणाले की, राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये विवाह दाखल्यावर लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे नमूद करून दाखले दिले जातात; मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही पद्धत अमलात आणली गेलेली नाही. त्यामुळे स्थानिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन दोन्ही नावांचा समावेश असलेले सुधारित विवाह प्रमाणपत्र उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्यातील हजारो महिलांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास राऊळ यांनी व्यक्त केला. या रास्त मागणीवर जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवली असल्याचेही रूपेश राऊळ यांनी सांगितले.

 

Exit mobile version