दोन दिवसांत अहवाल न दिल्यास परिवहन मंत्र्यांकडे धाव घेण्याचा इशारा
सावंतवाडी, दि.०१: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने सावंतवाडी रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या हजारो चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी सावंतवाडी रेल्वे स्थानक ते दोडामार्ग-तिलारी थेट एसटी बससेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबुराव दत्ताराम धुरी यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे केली आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबईसह विविध शहरांतून दरवर्षी लाखो चाकरमानी कोकणात दाखल होतात. मात्र सावंतवाडी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर दोडामार्ग तालुक्यात जाण्यासाठी थेट एसटी बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. स्थानकावरून आधी सावंतवाडी बसस्थानकापर्यंत जाण्यासाठी रिक्षाचालकांना अव्वाच्या सव्वा भाडे द्यावे लागते. त्यानंतर पुन्हा बस बदलून प्रवास करावा लागत असल्याने वेळ आणि पैशांचा मोठा अपव्यय होतो, ही बाब बाबुराव धुरी यांनी एसटी महामंडळाला दिलेल्या निवेदनात अधोरेखित केली आहे.
या त्रासातून चाकरमान्यांची सुटका करण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी किमान सात दिवस अगोदर सावंतवाडी रेल्वे स्थानकावरून सुटणारी आणि बांदा (नॉन-स्टॉप), दोडामार्गमधील सर्व थांबे व पुढे तिलारी/पाटये पुनर्वसन केंद्रापर्यंत जाणारी थेट एसटी सेवा सुरू करावी, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. ही सेवा सुरू झाल्यास चाकरमानी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, या संवेदनशील विषयावर स्थानिक पातळीवरून त्वरित कार्यवाही न झाल्यास थेट राज्याच्या परिवहन मंत्र्यांकडे दाद मागितली जाईल, असा इशाराही धुरी यांनी दिला आहे. तसेच या मागणीवर एसटी महामंडळाने काय कार्यवाही केली, याचा अहवाल येत्या दोन दिवसांत द्यावा, अशी अटही निवेदनाद्वारे घालण्यात आली आहे. त्यामुळे आता गणेशोत्सवाच्या गर्दीपूर्वीच प्रशासन ही थेट एसटी सेवा सुरू करून चाकरमान्यांना दिलासा देणार का, याकडे संपूर्ण दोडामार्ग-तिलारी परिसराचे लक्ष लागले आहे.

