१५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा!
कुडाळ,दि.११: माणगाव खोऱ्यातील निळेली येथील पशुपैदास केंद्रातील अधिकाऱ्यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. या केंद्रातील कारभाराची खातेनिहाय सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी येत्या १५ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत दीपक जयराम काणेकर आणि मिलिंद रामा धुरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना तशा आशयाचे निवेदन दिले आहे.
पशुपैदास केंद्राच्या ५०० एकर शासकीय जागेत मोठ्या प्रमाणावर बेसुमार वृक्षतोड झाली असून, स्थानिक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे योग्य मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण दिले जात नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच एकाच ठिकाणी दीर्घकाळ पदभारावर असलेल्या अधिकाऱ्यांमुळे हा मनमानी कारभार सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या पाहणीत प्राथमिकदृष्ट्या २ ते ३ एकर क्षेत्रातील वृक्षतोड उघडकीस आली असून, संपूर्ण क्षेत्राची सखोल पाहणी केल्यास शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण गैरप्रकाराबाबत यापूर्वीच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनंतर विद्यापीठाने चौकशी समिती नेमली खरी; मात्र या समितीने पारदर्शक भूमिका न घेता संबंधित अधिकाऱ्यांना संशयास्पदरीत्या ‘क्लीन चिट’ दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणात दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरूच दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर संशयही निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. १५ ऑगस्टपर्यंत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असे दीपक काणेकर, मिलिंद धुरी, विनोद जाधव, नामदेव जानकर, सखाराम गावडे, नकुल गवंडे, किशोर दळवी, विष्णू राणे आणि वसंत दळवी यांच्यासह माणगाव खोऱ्यातील ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे.

