Site icon Kokandarshan

केंद्रशाळा पिंगुळी येथे शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्गाचा उत्साहपूर्ण शुभारंभ

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपक्रम; अनुभवी शिक्षकांचे मिळणार मार्गदर्शन

कुडाळ,दि.०७ : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा पिंगुळी नं. १ येथे इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्गाचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना देऊन त्यांना स्पर्धात्मक युगात सक्षम बनवण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या संकल्पनेतून या विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाराम सडवेलकर स्वतः उपस्थित होते. व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त केंद्रप्रमुख वासुदेव मराठे आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रशांत धोंड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंगुळी नं. १ चे केंद्रप्रमुख गणेश नाईक यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी उपक्रमाची पार्श्वभूमी व त्याची गरज स्पष्ट केली.

मार्गदर्शन करताना वासुदेव मराठे यांनी विद्यार्थ्यांना नियमित अध्ययन, स्व-अभ्यास, सातत्यपूर्ण लेखन सराव आणि जुन्या प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास करण्याचे आवाहन केले. तर प्रशांत धोंड यांनी विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती जोपासून प्रत्येक विषयाची संकल्पना समजावून घेतल्यास यशाचा मार्ग सुकर होतो, असा आत्मविश्वास व्यक्त केला. दोन्ही मान्यवरांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप, वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वासाचे महत्त्व याविषयी मौलिक मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात गंगाराम सडवेलकर यांनी स्पष्ट केले की, केवळ परीक्षेत यश मिळवणे हेच अंतिम ध्येय नसून विद्यार्थ्यांचे उत्तम व्यक्तिमत्त्व घडवणे आणि त्यांच्यात ज्ञानाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला धार लावणारी असून अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही उत्तम संधी उपलब्ध होतात, असे सांगत त्यांनी आयोजक शिक्षकांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी विद्यार्थ्यांना अनुभवी शिक्षकांकडून विषयनिहाय मार्गदर्शन, सराव चाचण्या, प्रश्नपत्रिका विश्लेषण, अभ्यास नियोजन आणि शंका निरसन यांचा लाभ मिळणार आहे. या मार्गदर्शनाचा फायदा पिंगुळी केंद्रातील आठ आणि तेरसेबांबर्डे केंद्रातील तीन शाळांमधील इयत्ता चौथीच्या ५१ व सातवीच्या २३ अशा एकूण ७४ विद्यार्थ्यांना होणार आहे.

या सोहळ्यास तेर्सेबाबर्डे केंद्राचे केंद्रप्रमुख महेश परुळेकर, दोन्ही केंद्रांतील सर्व मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक राजाराम कविटकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार केंद्रमुख्याध्यापक स्वरा काळसेकर यांनी मानले. पिंगुळी केंद्रातील सर्व शिक्षकवृंदांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत हा वर्ग विद्यार्थ्यांच्या यशाचा मजबूत पाया ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

Exit mobile version