दहावी, बारावी व पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांसह लोकप्रतिनिधींचा होणार विशेष सत्कार; समाजबांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अध्यक्षांचे आवाहन
सावंतवाडी, दि.०१: सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी, बारावी आणि पदवीधर परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, तसेच समाजातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सरपंचांचा गौरव करण्यासाठी ‘गुणगौरव २०२६’ या विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा उद्या, रविवार दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता सावंतवाडी येथील काझीशहाबुद्दीन हॉलमध्ये पार पडणार आहे.
या सोहळ्यात सावंतवाडी तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा-कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विशेष व्यक्तींना “भंडारी समाजरत्न” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. याशिवाय शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या दहावीतील ७० टक्के, बारावीतील ६० टक्के आणि पदवी परीक्षेतील ६० टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यासपीठावरून विशेष पुरस्कार देऊन गौरवले जाईल.
भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुका सोबतच समाजाचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा यथोचित सत्कार करून त्यांच्या भावी प्रवासाला शुभेच्छा देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या सोहळ्याला सर्व समाजबांधवांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंतांचा उत्साह वाढवावा, असे आग्रही आवाहन सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचे अध्यक्ष दत्तप्रसाद अरविंदेकर यांनी केले आहे. कार्यक्रमा संदर्भात अधिक माहितीसाठी ९४२२६ ३३३३९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

