Site icon Kokandarshan

निळेली पशुपैदास क्षेत्रातील ‘त्या’ दोन अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करा!

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनची कुलगुरूंना निवेदनाद्वारे मागणी; प्रदीर्घ सेवा आणि मनमानी कारभाराचा गंभीर आरोप

कुडाळ,दि.३१: कुडाळ तालुक्यातील निळेली येथील पशुपैदास क्षेत्रातील दोन अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन (IHRWA) सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. मानसी परब आणि महिला जिल्हासचिव सौ. संजना सावंत यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांना लेखी निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, कुशल पशुवैद्यकीय अधिकारी व प्रभारी अधीक्षक श्री. विष्णू सखाराम कवीटकर हे गेल्या ३० वर्षांपासून, तर कृषी सहाय्यक श्री. उमेश कृष्णा पायशेट हे गेल्या १८ वर्षांपासून एकाच कार्यालयात कार्यरत आहेत. शासकीय नियमांची उघडपणे पायमल्ली करत हे अधिकारी एकाच ठिकाणी टिकून आहेत आणि तेथे मनमानी कारभार चालवला जात असल्याचा थेट आरोप संघटनेने केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार शासकीय कर्मचाऱ्यांची पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा एकाच ठिकाणी झाल्यास बदली होणे आवश्यक आहे. असे असताना हे दोन्ही कर्मचारी गेली तीन आणि दीड दशक कोणत्या नियमाखाली एकाच कार्यालयात सेवा बजावत आहेत? याचा स्पष्ट खुलासा विद्यापीठ प्रशासनाने करावा, असा सवाल निवेदनातून विचारण्यात आला आहे. तसेच, विशेष परिस्थितीत यांना मुदतवाढ दिली असली, तरी ती कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या कारणास्तव दिली, याचा लेखी खुलासा व्हावा अशी मागणीही करण्यात आली आहे.

या प्रदीर्घ कालावधीत परिसरातील व गावातील शेतकऱ्यांना या अधिकाऱ्यांकडून कोणताही फायदा झालेला नाही, तसेच पशुपैदास क्षेत्राकडून शेतकऱ्यांसाठी कोणतेही प्रशिक्षण कार्यक्रम किंवा सुधारणा राबवल्या गेल्या नाहीत, असा दावाही मानवाधिकार संघटनेने केला आहे. शासकीय धोरण व नियमांचे उल्लंघन करून चाललेल्या या कारभाराची वरिष्ठ पातळीवरून तात्काळ दखल घेण्यात यावी आणि संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांची नियमानुसार बदली करण्यात यावी, अशी ठाम मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंकडे केली आहे.

Exit mobile version