Site icon Kokandarshan

शिक्षणाचा दर्जा टिकवून विद्यार्थ्यांनी करिअरमधील यशाचे शिखर गाठावे : पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण

लोकमान्य ट्रस्ट संचलित ‘शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स’मध्ये फ्रेशर्स पार्टी उत्साहात

सावंतवाडी,दि.३१: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक, उद्योग आणि व्यावसायिक जडणघडणीमध्ये लोकमान्य ट्रस्टचा वाटा अत्यंत मोठा आहे. या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी या भागातील तरुण-तरुणींच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने बिझनेस मॅनेजमेंट व हॉटेल मॅनेजमेंट यांसारखी कॉलेजेस सुरू करून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे नवे दालन निर्माण करून दिले आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मिळवलेले यश आता कॉलेज जीवनात टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करायला हवेत. देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स हे अत्यंत दर्जेदार आणि विद्यार्थ्यांच्या यशाचे शिखर उंचावणारे कॉलेज आहे, असे प्रतिपादन सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले.

सावंतवाडी येथील लोकमान्य टिळक संचलित देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित फ्रेशर्स पार्टी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘संवाद तरुण भारत’चे सावंतवाडी प्रतिनिधी व कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत हे होते. व्यासपीठावर प्राचार्य यशोधन गवस यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना अमोल चव्हाण म्हणाले की, गेली १६ वर्षे सावंतवाडीत हे कॉलेज यशस्वीरीत्या सुरू आहे. संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर यांनी व्यापक दृष्टिकोन ठेवून आणि भविष्याचा विचार करून बिझनेस मॅनेजमेंट तसेच हॉटेल मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम आपल्याच भागात उपलब्ध करून दिले. विद्यार्थ्यांनी ताण-तणाव न घेता आनंदाने आपले शिक्षण पूर्ण करावे. पाश्चात्त्य संस्कृती आपल्याकडे आली असली तरी आज पाश्चात्त्य देशांनीही आपली संस्कृती स्वीकारली आहे, याचे भान ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करत करिअरमध्ये यश संपादन करावे, असा सल्ला त्यांनी दिला.

अध्यक्षीय भाषणात ॲड. संतोष सावंत म्हणाले की, आजच्या युगात आपण प्रत्येक बाबतीत व्यवस्थापन आणि नियोजन करूनच पुढचे पाऊल टाकत असतो. विद्यार्थ्यांनी बारावीनंतर बिझनेस मॅनेजमेंटसारखा व्यावसायिक अभ्यासक्रम निवडून करिअरच्या यशाची पहिली पायरी यशस्वीरीत्या गाठली आहे. सध्या प्रत्येक क्षेत्रात इव्हेंट मॅनेजमेंटचा काळ आला असल्याने या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांसाठी यशाच्या अनेक वाटा खुल्या होणार आहेत.

आनंददायी आणि मुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी यशाचे मार्ग शोधावेत. मेहनत घेतानाच आई-वडील, संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, प्राचार्य, शिक्षक आणि कर्मचारी वर्गाचा आदर राखावा. व्यवस्थापनात यश मिळवण्यासाठी आपले वागणे, बोलणे आणि राहणीमान हीच खरी गुरुकिल्ली आहे. उत्तम मेहनत आणि कष्टाला नेहमीच परमेश्वराची साथ लाभते, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य यशोधन गवस यांनी केले. सूत्रसंचालन दीक्षा काकतकर व गौरव गावडे यांनी केले, तर आभार प्रा. साईप्रसाद पंडित यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशासाठी अस्मिता गवस, साईप्रसाद पंडित, आनंद नाईक, शैलेश गावडे, मेघा मयेकर, तृप्ती नाईक यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन (१४ वी)द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी  केले होते.

Exit mobile version