सावंतवाडी,दि.२६: स्वामींचा अंश आणि गावडे कुटुंबाच्या जगण्याचा खरा आधार बनलेला लाडका समर्थ सीताराम गावडे (वय १५ वर्षे ५ महिने) याच्या निधनाला आज १२ दिवस पूर्ण होत आहेत. बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी रात्री १० वाजता काळाने घातलेल्या या घावामुळे न्यू सबनिसवाडा बिरोडकर टेंब, सावंतवाडी परिसरासह संपूर्ण गावडे-सावंत परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आज त्याच्या १२ व्या दिवसाच्या निमित्ताने त्याच्या पावन आणि पवित्र स्मृतींना संपूर्ण परिवाराकडून अत्यंत भावूक वातावरणात श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
जन्माच्या तिसऱ्याच दिवशी छोट्या मेंदूला झालेल्या इजेमुळे समर्थला आयुष्यभर अंथरुणाला खिळून राहावे लागले होते. चालता किंवा मोकळेपणाने बोलता येत नसले तरी त्याच्या हसऱ्या चेहऱ्याने, निरागस नजरेने आणि दोन-चार शब्दांच्या साथीने त्याने संपूर्ण घराला जिवंत ठेवले होते. आई सौ. संयुक्ता गावडे, वडील सीताराम गावडे आणि मोठा भाऊ साईश यांनी त्याला कधीही ओझे न मानता स्वामींचा प्रसाद आणि ईश्वरसेवा मानून त्याची मनापासून देखभाल केली.
समर्थच्या जाण्यातही त्याचे कुटुंबावर असलेले अथांग प्रेम दिसून आले. मोठा भाऊ साईश याच्या डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधील द्वितीय वर्षाच्या अंतिम प्रात्यक्षिक परीक्षेचा शेवटचा दिवस संपण्याची समर्थने जणू वाट पाहिली. भावाच्या शिक्षणात कोणताही व्यत्यय येऊ नये, अशा अत्यंत संवेदनशील विचारानेच त्याने अखेरचा श्वास घेतल्याची भावना कुटुंबाने व्यक्त केली. साईश दररोज घराबाहेर पडताना समर्थच्या पाया पडत असे; आज ते पाय समोर नसले तरी त्या पावलांचे संस्कार आणि आठवणी कायम सोबत राहतील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
काहीजण सांत्वन करताना “तो सुटला आणि तुम्हीही सुटलात” असे म्हणतात, परंतु गावडे कुटुंबासाठी समर्थ हा त्यांच्या श्रद्धेचा आणि जगण्याचा मुख्य आधार होता. त्याच्या शांत उपस्थितीने घराला नेहमीच सकारात्मक ऊर्जा दिली.
माझी कुलदेवता आई तुळजाभवानी समर्थच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो, अशी प्रार्थना करत सीताराम गावडे (बाबा), सौ. संयुक्ता गावडे (आई), साईश गावडे (भाऊ) तसेच संपूर्ण गावडे–सावंत परिवाराने आपल्या लाडक्या समर्थच्या स्मृतींना आज १२ व्या दिवशी अश्रूपूर्ण नयनांनी पुनश्च भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

