तीन वर्षांच्या बालवारकऱ्यांच्या भक्तिमय पाई वारीने अवघी सावंतवाडी नगरी दुमदुमली
सावंतवाडी, दि.२५: आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर सावंतवाडी शहरातील अंगणवाडी क्रमांक १५ च्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्यांनी काढलेली अभूतपूर्व पाई वारी ऐतिहासिक संस्थानकालीन विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्ये मोठ्या भक्तिभावात विसावली. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ-मृदुंग आणि मुखात विठू माऊलीचा जयघोष करत निघालेल्या या बालवारकऱ्यांमुळे जणू साक्षात विठ्ठल-रखुमाईच भक्तांच्या भेटीसाठी अवतरल्याचा मनमोहक भास उपस्थितांना झाला.
शहरातील उभाबाजार येथून मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात निघालेली ही पाई वारी सालईवाडा येथील ऐतिहासिक विठ्ठल-रखुमाई मंदिरापर्यंत मार्गस्थ झाली. या वारीमध्ये चिमुकला स्वराज गोरे याने विठ्ठलाची, तर ष्रिशा देशमुख हिने रखुमाईची सुरेख वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या बालवारकऱ्यांच्या पालखीचे भोई बनण्याचा मान दुर्वाश जाधव आणि समर्थ नेवगी या दोघांनी भूषवला.
या नयनरम्य सोहळ्यात गितांश मुंज, नियत, शब्दाली कदम, रुद्राली बेळगावकर, अलिषा दापले, दुर्वा नाईक, अर्पिता कडगावकर, दक्षायनी, नितेश चव्हाण, हितेश बांदेकर, लकी शर्मा, दुर्वा कोरगावकर, वीरा रेडकर, रसिका गोरे, मल्हार लाखे, श्रुती गावडे आणि मोक्षतारी या चिमुकल्यांनी वारकऱ्यांची पारंपरिक वेशभूषा परिधान करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.
या संकल्पनेचे उत्तम नियोजन आणि मार्गदर्शन अंगणवाडी सेविका अनुराधा पवार व मदतनीस अमिषा सासोलकर यांनी केले. चिमुकल्यांचा हा भक्तिमय उत्साह द्विगुणित करण्यासाठी पालक श्रेया नेवगी, ज्योती कदम, आरती दापले, आर्या मुंज, अवंतिका गोरे व दिलीप देशमुखे हेदेखील वारीत पूर्ण श्रद्धेने सहभागी झाले होते. टाळ-मृदुंगाचा गजर आणि ‘ज्ञानबा तुकाराम’च्या जयघोषात निघालेली ही बालवारी सालईवाडा येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात पोहोचल्यानंतर तिथे विसावली. या सोहळ्यामुळे संपूर्ण सावंतवाडी परिसर आणि मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात पार न्हाऊन निघाला होता.

