Site icon Kokandarshan

कोकणच्या पारंपरिक फळझाडांना पुनरुज्जीवित करण्याचा ‘कलंबिस्त’ वासियांचा स्तुत्य संकल्प

शिवसाम्राज्य संघटना व दुग्ध व्यवसायिक संस्थेचा अनोखा उपक्रम

सावंतवाडी, दि.२०: कोकण म्हटले की आज जगप्रसिद्ध हापूस आंबा डोळ्यांसमोर येतो. मात्र, या झगमगाटात कोकणातील आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक गावठी आंबे, रतांबे व पेरू यांसारखी झाडे आता दृष्टीआड होत चालली आहेत. होळी सणात प्रत्येक गावात किमान एका आंब्याच्या वृक्षाचे होळी म्हणून पूजन केले जाते, तसेच घरांच्या बांधकामासाठीही या लाकडाचा वापर होतो. परंतु, हल्लीच्या सिमेंट-काँक्रीटच्या युगात या पारंपरिक वृक्षांची नव्याने लागवड होताना दिसत नाही. कोकणची ओळख असलेले हे पारंपरिक आंबा, पेरू आणि मिरीचे वृक्ष आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर, या वृक्षांना पुन्हा संजीवनी देण्यासाठी आणि वन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी कलंबिस्त गावात एक कौतुकास्पद चळवळ हाती घेण्यात आली आहे. कलंबिस्त पंचक्रोशी मर्यादित दुग्ध व्यवसायिक संस्था आणि शिवसाम्राज्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील मोकळ्या व पडीक जागेत पारंपरिक फळझाडांची लागवड करण्याचा नवा संकल्प सोडण्यात आला आहे.

या मोहिमेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला असून, धावगिरेश्वर देवस्थान परिसरातील मोकळ्या जागेत जवळपास ७० पारंपरिक गावठी आंबे, मिरी आणि पेरू अशी १०० हून अधिक झाडे रविवारी लावण्यात आली. घरटी सैनिक परंपरा लाभलेल्या आणि निसर्गरम्य परिसर असलेल्या कलंबिस्त गावातील डोंगराळ भागात पडीक जमिनी मोठ्या प्रमाणावर आहेत. पूर्वी येथे आंबा, पेरू, फणसाची झाडे विपुल प्रमाणात होती, जी आता नामशेष झाली आहेत. सध्या कलमी हापूस आणि पायरीची लागवड मोठ्या प्रमाणात होत असली, तरी पारंपरिक गावठी आंब्यांकडे दुर्लक्ष होत आहे. अनेकदा आंबे खाल्ल्यानंतर लोक बिया फेकून देतात, मात्र या दुग्ध संस्थेने व तरुणांनी चक्क जंगलातून आणि आजूबाजूच्या परिसरातून शोधून आणलेल्या पारंपरिक गावठी आंब्यांच्या रोपांची लागवड केली आहे. यापुढे पावसाळ्यात आंबा आणि फणसाच्या बिया थेट पडीक क्षेत्रात पेरून नैसर्गिक पद्धतीने जंगल समृद्ध करण्याचा मानस या संस्थांनी व्यक्त केला आहे. शेतकरी आणि तरुण वर्गाला सोबत घेऊन गाव पर्यावरणदृष्ट्या समृद्ध करणे हा या चळवळीचा मुख्य हेतू आहे.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला दुग्ध संस्थेचे चेअरमन ॲड. संतोष सावंत, सचिव व माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत, उपाध्यक्ष लक्ष्मण राऊळ, प्रकाश तावडे, राजन घाडी, संदीप सावंत, बाळकृष्ण मेस्त्री, तसेच शिवसाम्राज्य संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश सावंत, रोहन सावंत, सुभाष उर्फ आप्पाजी देसाई, स्वप्नील सावंत, विकी सावंत, विराज सावंत, शेखर मेस्त्री आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामागची पार्श्वभूमी स्पष्ट करताना कलंबिस्त दुग्ध संस्थेचे चेअरमन ॲड. संतोष सावंत यांनी सांगितले की, सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावांत आणि शहरांमध्ये माकड, गवारेडे, हत्ती व वनगाई यांसारख्या वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. या वन्य प्राण्यांच्या दहशतीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आता शेती आणि बागायती करणे सोडून दिले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, परप्रांतीयांनी जिल्ह्यातील बहुतांश डोंगरदऱ्यांवर ताबा मिळवून वस्त्या सुरू केल्यामुळे जंगले उद्ध्वस्त झाली आहेत. वन्य प्राण्यांचे हक्काचे अधिवास आणि खाद्य हिरावले गेल्यामुळेच ते आता खाद्याच्या शोधात मानवी वस्ती व शेतांकडे वळले आहेत. या वन्य प्राण्यांना रोखण्यासाठी त्यांचे नेहमीचे खाद्य असणारी पेरू, आंबा यांसारखी फळझाडे जर जंगलात आणि पडीक डोंगराळ भागात उपलब्ध करून दिली, तर ते मानवी वस्त्यांपासून दूर राहतील. हाच हेतू समोर ठेवून डोंगराळ पडीक भागात मोठ्या प्रमाणावर पेरू व इतर फळझाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, हे त्याचे पहिले पाऊल आहे. श्री धावगिरेश्वर चरणी केलेल्या संकल्पानुसार शिवसाम्राज्य मंडळाच्या तरुणांनी दरवर्षी पडीक जमिनीत पारंपरिक आंब्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येकाने किमान एक तरी पारंपरिक फळझाड लावून कोकणची ही शान टिकवून ठेवावी, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

गावाच्या विकासासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी विविध संस्थांचे एकत्र येणे ही काळाची गरज बनली आहे. या उपक्रमाचे कौतुक करताना दुग्ध संस्थेचे सचिव रमेश सावंत यांनी विश्वास व्यक्त केला की, दरवर्षी संस्थेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाच्या हिताची फळबाग लागवड करून गाव समृद्ध बनवला जाईल आणि यासाठी शेतकऱ्यांनी सक्रिय सहकार्य करावे. दुसरीकडे, शिवसाम्राज्य मंडळाचे सिद्धेश सावंत व रोहन सावंत यांनी स्पष्ट केले की, निसर्ग आणि पर्यावरणासोबतच शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन आणि कृषी अशा सर्वच क्षेत्रांत तरुणांना पुढे आणण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा संघटनेचा संकल्प आहे. या सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमाला सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, सामाजिक कार्यकर्ते सुरेश उर्फ आबा सावंत, तसेच भारत-पाक आणि चीन युद्धातील देशाचे रक्षक राहिलेले माजी सैनिक विठ्ठल सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले. कलंबिस्त गावातील तरुणांचा आणि संस्थांचा हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यासाठी पथदर्शी ठरत आहे.

Exit mobile version