Site icon Kokandarshan

आंबा-काजू उत्पादकांना मोठा दिलासा; नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात जिल्हा बँकेकडून १ कोटी ९० लाखांची व्याज सवलत जमा

  1. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम; ७ हजार ३१० सभासदांना थेट लाभ

सिंधुनगरी,दि.१७: हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने मोठा दिलासा दिला आहे. बँकेने दिलेल्या आश्वासनानुसार, आंबा-काजू पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ टक्के व्याज सवलत (रिबेट) लागू करण्यात आली असून, एकूण १ कोटी ९० लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करण्यात आली आहे. चालू शेती हंगामाच्या तोंडावर ही रक्कम मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी मोठी मदत होणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.

सन २०२५-२६ या वर्षात अवकाळी पाऊस, वादळ, धुके, खार आणि दव यांसारख्या लहरी हवामानाचा आंबा आणि काजू पिकांना मोठा फटका बसला होता. यामुळे उत्पादनात कमालीची घट होऊन बागायतदारांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले होते. या गंभीर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकरी कमालीचे आर्थिक अडचणीत आले होते. या पार्श्वभूमीवर, जिल्हा बँकेमार्फत विविध कार्यकारी विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून तसेच थेट स्वरूपात पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणे अत्यंत गरजेचे होते. हीच गरज ओळखून बँकेने नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी व्याजदरात २ टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.

बँकेने घेतलेल्या या निर्णयाची अत्यंत पारदर्शकपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यानुसार, ३० जून २०२६ अखेरपर्यंत आपल्या पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल ७ हजार ३१० सभासद शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी थेट वर्ग करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी जिल्हा बँकेने ही संपूर्ण रक्कम बँकेच्या स्वेच्छा नफ्यातून उपलब्ध करून दिली आहे. ऐन शेतीच्या हंगामात बँकेकडून मिळालेल्या या आर्थिक पाठबळामुळे जिल्ह्यातील आंबा-काजू उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, यामुळे शेतीच्या कामांना गती मिळेल, असा विश्वास अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version