ठाणे/सिंधुदुर्ग, दि.१२: लग्नापूर्वी स्वतःचा बंगला असल्याचे खोटे सांगून फसवणूक करणे, पतीचे नपुंसकत्व लपवण्यासाठी विवाहितेवर भोंदू बाबांच्या माध्यमातून अघोरी जादूटोणा करणे आणि तिचा शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ केल्याप्रकरणी एका बड्या राजकीय कुटुंबाविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. माजी लोकप्रतिनिधींच्या चिरंजीवांसह कुटुंबातील सदस्य आणि भोंदू बाबा अशा एकूण ९ जणांवर ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात पीडित विवाहितेने दिलेल्या सविस्तर जबाबावरून हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, या हाय-प्रोफाइल प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार युवतीचा विवाह ३ डिसेंबर २०१७ रोजी वांद्रे (पूर्व), मुंबई येथे तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या चिरंजीवाशी झाला होता. विवाह जुळवताना संबंधित कुटुंबीयांनी वाकोला येथे स्वतःचा स्वतंत्र बंगला असल्याचे आणि रुनवाल सिंफनी येथे आलिशान फ्लॅट असल्याचे सांगितले होते, मात्र लग्नानंतर वरात थेट वाकोला येथील झोपडपट्टीतील निवासस्थानी गेल्यावर आपली मोठी फसवणूक झाल्याचे विवाहितेच्या निदर्शनास आले. याबाबत तिने जाब विचारला असता, पतीने अत्यंत उर्मटपणे वागणूक देऊन तिला धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. लग्नानंतर पती हा शारीरिक संबंध ठेवण्यास सातत्याने टाळाटाळ करत होता आणि ऊटी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड यांसारख्या देशांमध्ये हनिमून व पर्यटनासाठी गेले असता, तिथेही पतीने जवळीक साधण्यास नकार दिला व विचारणा केली असता अमानुष मारहाण केल्याचे विवाहितेने जबाबात म्हटले आहे. पतीचे हे नपुंसकत्व लपवण्यासाठी सासरच्या मंडळींनी संगनमत करून विवाहितेला ‘बाहेरची बाधा’ असल्याचे भासवायला सुरुवात केली आणि सासरच्यांच्या सांगण्यावरून मुंबईतील कुर्ला येथील एक मुस्लिम बाबा, भांडुपचे आबा राऊत, कोलगाव सावंतवाडी येथील फिरोज बाबा, करूड घाट राजापूर येथील काझी बाबा आणि नानेली कुडाळ येथील हरिश्चंद्र घाडी आदी भोंदू बाबांकडे विवाहितेला नेण्यात आले. या भोंदू बाबांनी सप्टेंबर २०१८ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत विवाहितेवर लिंबू कापणे, काळ्या कणकेच्या बाहुल्या, टाचण्या टोचणे, अंगारे-धुपारे देणे, जिवंत कोंबड्याचा बळी, केस उपटणे आणि गोमूत्र पिण्याची सक्ती करणे यांसारखे अघोरी व अमानुष प्रकार केले, ज्यामुळे विवाहितेची मानसिक स्थिती खालावली होती.
पतीच्या या समस्येवर मानसोपचार तज्ज्ञांनी दिलेल्या वैद्यकीय सल्ल्यांना व उपचारांना पतीने कोणताही प्रतिसाद दिला नाही, उलट सासरच्या मंडळींनी आपल्या राजकीय वजनाचा व पदाचा वापर करून डॉक्टरांना मॅनेज करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. पतीने नैसर्गिक गर्भधारणेचे सर्व पर्याय फेटाळून लावत विवाहितेवर घरच्या घरी अत्यंत वेदनादायी अशी “होम इन्सेमिनेशन” करण्याची प्रक्रिया करण्यासाठी दबाव आणला व तिचा छळ केला, तसेच सासरच्या राजकीय व सामाजिक कार्यक्रमांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून विवाहितेला तिची मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेण्यासही जबरदस्ती करण्यात येत होती. या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने पोलिसांत धाव घेतली असून, तिच्या फिर्यादीवरून कापूरबावडी पोलिसांनी पती गितेश राऊत, सासरे विनायक राऊत, सासू शामल राऊत, लग्न जुळवणारे मध्यस्थ सुरेखा राजेश सरफरे व राजेश सरफरे, चुलत सासरे आबा राऊत, तसेच फिरोज बाबा, काझी बाबा आणि हरिश्चंद्र घाडी यांच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत. एका राजकीय कुटुंबाशी संबंधित हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने संपूर्ण कोकण आणि ठाणे परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

