नेमळे करंगुटकरवाडीतील वीज समस्या सोडवण्यासाठी उपसभापती गौरव मुळीक यांचा पुढाकार; ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव
सावंतवाडी,दि.०६: लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ निवडणुकांपुरती आश्वासने देणारे नसून, संकटाच्या वेळी प्रत्यक्ष मैदानात उतरून जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे हक्काचे माणूस असतात, याचा प्रत्यय सावंतवाडी तालुक्यात आला आहे. तालुक्यातील नेमळे करंगुटकरवाडी (गावडेवाडी) येथे वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या हाकेला ओ देत, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक यांनी मध्यरात्री स्वतः घटनास्थळी जाऊन पहाटे दोन वाजेपर्यंत उभे राहून वीजपुरवठा सुरळीत केला. त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे परिसरातून त्यांचे जोरदार कौतुक होत आहे.
नेमळे करंगुटकरवाडी परिसरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीज समस्येमुळे हैराण झाले होते. रविवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास स्थानिक ग्रामपंचायत सदस्य सौ. शुभांगी रेडकर यांनी या समस्येबाबत थेट उपसभापती गौरव मुळीक यांच्याशी संपर्क साधला आणि येथील अंधाराच्या साम्राज्याची व नागरिकांच्या गैरसोयीची कल्पना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गौरव मुळीक यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने महावितरणच्या संबंधित वायरमनला पाचारण केले आणि स्वतःही रात्रीच्या वेळी थेट घटनास्थळाकडे कूच केली.
रात्रीच्या घनदाट अंधारात वीज पुरवठा खंडित होण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी उपसभापती गौरव मुळीक यांनी स्वतः महावितरण कर्मचाऱ्यांसोबत संपूर्ण लाईनची पाहणी केली. बिघाड सापडल्यानंतर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. विशेष म्हणजे, केवळ कर्मचाऱ्यांना सूचना देऊन न थांबता गौरव मुळीक हे काम पूर्ण होईपर्यंत म्हणजे पहाटे दोन वाजेपर्यंत घटनास्थळी ठाण मांडून उभे राहिले. त्यांच्या या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे कर्मचाऱ्यांनीही वेगाने काम केले आणि अखेर मध्यरात्रीनंतर परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत झाला.
एका लोकप्रतिनिधीने मध्यरात्रीची वेळ असतानाही स्वतः रस्त्यावर उतरून जनतेची समस्या सोडवल्याने नेमळे करंगुटकरवाडी (गावडेवाडी) परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला. उपसभापती गौरव मुळीक यांच्या या कार्यतत्परतेचे आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचे ग्रामस्थांनी मनापासून कौतुक केले असून, भविष्यातही त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी असेच तत्पर राहावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

