राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा उपक्रम; विजेत्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांकडून कौतुक
सावंतवाडी, दि. २ : केंद्र शासनाच्या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा एक भाग म्हणून सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये बुधवार, दि. १ जुलै रोजी घोषवाक्य व पोस्टर स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता १२ वीच्या सुमारे ५० विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध कलाकृतींच्या माध्यमातून नशामुक्तीचा प्रभावी संदेश दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभारी प्राचार्या डॉ. सुमेधा नाईक यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. नाईक म्हणाल्या की, नशामुक्त समाजाची निर्मिती करणे ही केवळ शासनाची नव्हे, तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या सर्जनशीलतेचा आणि कल्पकतेचा वापर करून समाजात याविषयी जनजागृती निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच त्यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
सकाळी ९.३० वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी नशामुक्तीच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकणारी आणि जनजागृती करणारी अत्यंत आकर्षक पोस्टर्स व थेट मनाला भिडणारी घोषवाक्ये तयार केली. सकाळी ११.३० वाजेपर्यंत चाललेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता पणाला लावली होती. या संपूर्ण कलाकृतींचे परीक्षण योगेश गावित यांनी केले. त्यांनी दोन्ही प्रकारांतील उत्कृष्ट सादरीकरणांचे काटेकोर मूल्यमापन करून अंतिम विजेते घोषित केले.
या स्पर्धेत पोस्टर प्रकारात इयत्ता १२ वी कला (ब) चा अथर्व तिवरेकर याने प्रथम क्रमांक पटकावला, तर १२ वी विज्ञान (ब) ची प्राची परब ही द्वितीय आणि १२ वी कला (ब) ची सानिका गोसावी तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. दुसरीकडे, घोषवाक्य स्पर्धेत १२ वी कला (क) मधील ओम राऊत याने प्रथम, १२ वी वाणिज्य (ड) मधील रिया सावंत हिने द्वितीय आणि १२ वी वाणिज्य (ड) मधील वेदिका पिळणकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या प्रसंगी प्रभारी उपप्राचार्या सविता माळगे, स्पर्धा समिती प्रमुख प्रा. संतोष पाथरवट, स्पर्धा समिती सदस्या डॉ. संजना ओटवणेकर, प्रा. ज्योती सावंत, प्रसिद्धी समिती प्रमुख डॉ. अजेय कामत यांच्यासह प्रा. वनिता घोरपडे, प्रा. रणजित राऊळ, प्रा. पवन वनवे, प्रा. रणजित माने, प्रा. राहुल कदम, जोसेफ डिसिल्वा, निलेश कळगुंटकर, माया नाईक, स्पृहा टोपले, प्रा. दशरथ सांगळे, प्रा. महाश्वेता कुबल आणि प्रा. केदार म्हसकर आदी मान्यवर उपस्थित होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक केले व विजेत्यांचे अभिनंदन करत भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले.

