सावंतवाडी तहसीलदार पाटील यांच्याकडील उपविभागीय अधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार काढून रत्नागिरीतील वसावे यांच्याकडे; सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे यांचा प्रशासकीय पारदर्शकतेवर सवाल
*सावंतवाडी, दि.०२: सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे असलेला उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) पदाचा प्रभारी कार्यभार अचानक काढून घेऊन तो रत्नागिरी जिल्ह्यातील तथा तत्कालीन कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्याकडे सोपविण्याचा तडकाफडकी निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या धक्कादायक आणि अनपेक्षित निर्णयामुळे महसूल विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला असून, प्रशासनाच्या या कार्यपद्धतीवर सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सावंतवाडी उपविभागीय अधिकारी म्हणून समीर घारे यांची प्रशासनाने रीतसर नियुक्ती केली होती, मात्र त्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने हा प्रभारी कार्यभार सिंधुदुर्ग जिल्हा भूसंपादन अधिकारी श्रीमती शारदा पवार यांच्याकडे सोपवण्यात आला होता. परंतु, त्याही अचानक रजेवर गेल्यामुळे हा तात्पुरता चार्ज पुन्हा सावंतवाडी तहसीलदार श्री. श्रीधर पाटील यांच्याकडे देण्यात आला. या एकाच जागेवर अवघ्या काही दिवसांत तीन अधिकारी बदलल्याने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनामध्ये नक्कीच काहीतरी पाणी मुरत असून, मोठी लपवाछपवी सुरू असल्याचा थेट आरोप गवंडे यांनी केला आहे.
या संपूर्ण घडामोडींमागे नक्की कोणाचा हात आहे आणि सावंतवाडी तहसीलदार त्या दर्जाचे अधिकारी नसताना कोणत्या निकषांच्या आधारे त्यांना उपविभागीय महसूल अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला होता, याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नुकताच राज्याच्या महसूल अप्पर सचिवांचा सिंधुदुर्ग दौरा पार पडला आणि त्यानंतर लगेचच हा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला. एकाच महत्त्वाच्या पदावर एकापाठोपाठ तीन अधिकारी नेमून प्रशासनाला नेमके काय साध्य करायचे होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या तडकाफडकी बदल्यांमागे आजगाव आणि धाकोरे येथील मायनिंगची सूत्रे तर हलवली जात नाही ना, असा दाट संशय आता सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे यांनी व्यक्त केला असून, या प्रकारामुळे स्थानिक पातळीवर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सावंतवाडीसारख्या राजकीय व भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या तालुक्यात स्थानिक किंवा जिल्ह्यातील सक्षम अधिकारी उपलब्ध असताना, चक्क अन्य जिल्ह्यातून अधिकारी आणून बसवण्यामागे प्रशासनाचा नेमका उद्देश काय आहे आणि असा कार्यभार सोपविण्याची इतकी घाईघाईने काय गरज निर्माण झाली होती, असे अनेक प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे, इतका मोठा निर्णय घेऊनही या प्रशासकीय बदलामागील कोणतीही ठोस कारणे प्रशासनाने अद्याप अधिकृतपणे स्पष्ट केलेली नाहीत. यामुळे निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाने तात्काळ समोर येऊन अधिकृत स्पष्टीकरण देणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
एकीकडे शासन आणि प्रशासन आपल्या गतिमान व कार्यक्षम कारभाराचा मोठा दावा करत असताना, दुसरीकडे अशा संशयास्पद आणि अजब निर्णयांमुळे स्थानिक जनतेमध्ये आणि महसूल विभागात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रशासकीय बदलामुळे सावंतवाडी आणि परिसरातील दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर, तसेच सर्वसामान्यांच्या प्रलंबित प्रकरणांवर काय परिणाम होणार याकडेही आता सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. म्हणूनच, या संपूर्ण गोंधळामागील खरी वस्तुस्थिती आणि त्यामागची प्रशासकीय कारणे काय आहेत, ती जाहीर करण्यात यावी अशी प्रमुख मागणी गुरुदास गवंडे यांनी शेवटी केली आहे.

