Site icon Kokandarshan

सावंतवाडीत मुसळधार पावसामुळे माठेवाड्यात साचले पाणी; संस्थानकालीन मोरी ब्लॉक झाल्याने निवृत्त शिक्षकांच्या घरात शिरले नाल्याचे पाणी

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी दिली भेट; तात्काळ काम करण्याचे नगरपरिषद प्रशासनाला आदेश

सावंतवाडी,दि.०२: शहरात बुधवार सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माठेवाडा येथील आत्मेश्वर मंदिरामागे असलेल्या डॉ. साईल यांच्या घरात नाल्याचे पाणी शिरल्याची गंभीर घटना घडली आहे. संस्थानकालीन मोरी ब्लॉक झाल्याने हा प्रकार घडला असून, यामुळे रस्त्यासह घरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पुराच्या पाण्यात ८१ वर्षांचे वृद्ध व निवृत्त शिक्षक चंद्रकांत आकेरकर घरातच अडकून पडले. त्यांच्या घराच्या खळ्यात गुडघाभर तर स्वयंपाकघर, हॉल आणि बेडरूममध्ये पाणी साचल्याने त्यांचे मोठे हाल झाले. या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पॉटवर बोलावून काम करण्याचे आदेश दिले.

या भागात काही दिवसांपूर्वीच संस्थानकालीन मोरीची डागडुजी करण्यात आली होती. मात्र, नळपाणी योजनेच्या ठेकेदाराकडून रस्ता खोदताना या मोरीला धक्का लागल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन हे पाणी परिसरात तुंबले. घडलेल्या या प्रकारावर ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत आकेरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आपण निवृत्त शिक्षक असून औषधोपचारासाठी सावंतवाडीत राहतो, असे सांगत त्यांनी यापूर्वी नगरपरिषदेला कल्पना देऊनही दुर्लक्ष केल्याची कैफियत मांडली. आपले वय ८१ वर्षे असून या पाण्यात कसे जगायचे, पालिकेचे कर्मचारी येतात आणि जातात, मात्र ठोस कारवाई होत नाही, अशा शब्दांत त्यांनी आपले दुःख व्यक्त केले.

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी प्रत्यक्ष पाहणी करत आकेरकर यांना धीर दिला आणि तात्काळ कार्यवाही करण्याचा शब्द दिला. पालिकेचे आरोग्य, पाणीपुरवठा व बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी हजर असून साचलेले पाणी तात्काळ बाहेर काढले जाईल आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनीही नळपाणी योजनेच्या कामामुळे मोरी चोकअप झाल्याचे मान्य करत, मुख्य तिठ्यावरील जागा असल्याने वाहतुकीला अडथळा न आणता आजच्या आज हा प्रश्न सोडवला जाईल, असे स्पष्ट केले.

प्रशासनाच्या या तात्काळ प्रतिसादानंतर श्री. आकेरकर यांनी, हा आपला जन्मगाव असून ही एक नैसर्गिक आपत्ती आहे, नगराध्यक्षा ही समस्या नक्कीच दूर करतील, असा विश्वास व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी नगरसेविका दुलारी रांगणेकर, प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे, बांधकाम अभियंता तुषार सरडे यांच्यासह आरोग्य आणि पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version