Site icon Kokandarshan

सिंधुदुर्गात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा धडाक्यात शुभारंभ; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कणकवलीत बालकाला डोस पाजून जिल्हास्तरीय सुरुवात

जिल्ह्यात ९०४ केंद्रे आणि विशेष पथके सज्ज; ५ वर्षांखालील एकही बालक वंचित न ठेवण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. २८: भारत देशाला मिळालेला पोलिओ मुक्त दर्जा कायम राखण्यासाठी आज जिल्हाभरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे एका बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून या जिल्हास्तरीय मोहिमेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लसीकरणाचा शुभारंभ केल्यानंतर बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी नागरिकांना आवाहन केले की, देश जरी पोलिओमुक्त झाला असला, तरी हा दर्जा कायम राखणे आपले कर्तव्य आहे. जिल्ह्यातील ५ वर्षांखालील एकही बालक या पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये आणि प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला लस देऊन या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.

जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८ जून २०२६ रोजी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण २७ हजार ८०६ बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात ९०४ लसीकरण केंद्रे उभारण्यात आली असून, दुर्गम भाग आणि फिरत्या लोकसंख्येसाठी ८० मोबाईल पथके तर प्रवासातील बालकांसाठी ४३ ट्रान्झिट पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यातील २४९ उपकेंद्रे, ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ११ उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या मोहिमेत सक्रिय सहभागी आहेत.

याशिवाय जिल्ह्यातील दुर्गम भाग, स्थलांतरित कुटुंबे, वीटभट्ट्या आणि बांधकामस्थळांवर राहणाऱ्या मजुरांच्या बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत, जेणेकरून एकही मूल लसीकरणापासून सुटणार नाही. आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून ही राष्ट्रीय मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version