नारायण राणे आणि निलेश राणेंच्या माध्यमातून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; तोडगा निघेपर्यंत वाहतूक रोखणार
सावंतवाडी, दि.२६: गोव्यातील ‘पेडणे-बार्देश गोवा ट्रक ओनर्स असोसिएशन’च्या अन्यायकारक आणि जाचक धोरणामुळे सावंतवाडी तालुक्यातील पारंपारिक चिरेखाण (जांभा दगड) उत्खनन व विक्री व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. यामुळे स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे तसेच आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधणार असून, स्थानिक व्यावसायिकांना न्याय मिळवून देणार, असा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला. तसेच, या विषयावर जोपर्यंत सकारात्मक तोडगा निघत नाही, तोपर्यंत तालुक्यातील ४० चिरेखाणींमधून एकही गाडी गोव्यात जाणार नाही, असा तीव्र इशारा त्यांनी दिला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जर गोव्यातून वाळू आणि चिरे वाहतूक करणाऱ्या गाड्या सिंधुदुर्गात आल्या, तर त्याही रोखल्या जातील, असा इशारा श्री. परब यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना संजू परब म्हणाले की, गोवा आणि सिंधुदुर्गचे संबंध नेहमीच सलोख्याचे राहिले असून ते अबाधित राहावेत हीच आमची इच्छा आहे. मात्र, गोव्यातील ट्रक असोसिएशनच्या मनमानी भूमिकेमुळे हा वाद निर्माण झाला आहे. सध्या चिरेखाण व्यावसायिकांना जीएसटी भरावा लागत असून डिझेलचे दरही वाढले आहेत, त्यामुळे त्यांना दगडांचे भाव वाढवणे भाग पडले आहे. असे असतानाही जिल्ह्यातील गाड्या गोव्यात घेऊ न देणे आणि त्यांच्यावर बेकायदेशीर बंधने घालणे अत्यंत अन्यायकारक आहे. या अन्यायाविरोधात खासदार नारायण राणे यांच्याशी बोलून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तोपर्यंत तालुक्यातील सर्व ४० चिरेखाणींमधील वाहतूक बंद राहील आणि जिल्ह्यात इतर ठिकाणी जाणारी वाहतूकही थांबवली जाईल. गोव्याला येथून चिरे, खडी आणि वाळू मोठ्या प्रमाणावर पुरवली जाते, मात्र जर स्थानिक व्यावसायिकांना योग्य भावच मिळणार नसेल, तर व्यवसाय करणे शक्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात आमदार निलेश राणे यांच्याशी बोलून चिरेखाण व्यावसायिकांची त्यांच्याशी भेट घडवून आणली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, सावंतवाडी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर जांभा दगड घरकुल बांधकामासाठी आणि शेजारील गोवा राज्यात विक्रीसाठी पाठवला जातो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून गोव्यातील पेडणे-बार्देश ट्रक ओनर्स असोसिएशनकडून महाराष्ट्रातील वाहनधारक आणि चिरेखाण व्यावसायिकांची प्रचंड पिळवणूक सुरू आहे. सर्व मालवाहनधारकांना गोव्यातील संघटनेचा लोगो लावण्याची सक्ती केली जात असून गाड्या अडवून आरटीओ, पोलीस आणि माईन्स डिपार्टमेंटमार्फत जाणीवपूर्वक कारवाई करण्यास भाग पाडले जात आहे. इतकेच नव्हे तर गोवा चेकपोस्टवर गाड्या अडवून त्या बळजबरीने रिकाम्या करून घेणे आणि चालकांना धमकावण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. सध्या गोव्यातून येणाऱ्या आणि महाराष्ट्रातून जाणाऱ्या सर्व गाड्या बंद पाडल्यामुळे येथील चिरेखाण व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.
एकीकडे गोव्यातील युनियनच्या जाचाला सामोरे जावे लागत असताना, दुसरीकडे स्थानिक शासकीय विभागांकडूनही चिरेखाण व्यावसायिकांची कोंडी केली जात असल्याचे समोर आले आहे. हा व्यवसाय पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने यावर अवलंबून असणाऱ्या शेकडो कामगार आणि व्यावसायिकांच्या कुटुंबांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. त्यामुळे गोवा युनियनच्या मनमानी कारभाराला तात्काळ चाप लावावा आणि प्रशासकीय पातळीवरील जाचक अटी शिथिल करून न्याय द्यावा, अशी मागणी चिरेखाण व्यावसायिकांनी केली आहे.
या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, चिरेखाण व्यावसायिक संघाचे प्रकाश राऊत, अमित प्रभू, मदन सातोसकर, सुशिल कामटेकर, प्रदिप मुळीक, दिगंबर कवठणकर, प्रविण बर्वे, गिरीश परब, राजेंद्र नाईक, गंगाराम मठकर, रंजन गावडे, अजित कवठणकर आदींसह तालुक्यातील चिरेखाण व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
