आवाज निलेश राणेंचा घुमला आणि न्याय बळीराजाच्या दारी पोहोचला! शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी मानले जाहीर आभार
सावंतवाडी, दि.२६: धडाडीचे आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ. निलेश राणे यांच्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे. कोकणातील संकटात सापडलेल्या आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना राज्य शासनाने तब्बल २०९ कोटी १० लाख ६ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईला मंजुरी दिली आहे. या एकूण निधी पैकी सर्वाधिक लाभ मिळणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ७९.०५ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल शिवसेना आणि महायुतीच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन आणि आभार मानत असल्याची घोषणा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केली. ते सावंतवाडी येथे आयोजित जाहीर पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रसंगी जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, उपतालुका प्रमुख राजेश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना संजू परब म्हणाले की, आज महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्तम आणि अभ्यासू आमदार म्हणून आ. डॉ. निलेश राणे यांचे विरोधक देखील तोंडभरून कौतुक करत आहेत. त्यांनी मिळवून दिलेल्या या शासकीय निर्णयाचा कोकणातील तब्बल १ लाख ३४ हजार २५१ शेतकरी लाभार्थ्यांना थेट फायदा होणार आहे. ही मंजूर झालेली रक्कम कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याने बळीराजाला फार मोठा दिलासा मिळाला आहे. परब पुढे म्हणाले की, ही केवळ पहिल्या टप्प्यातील मदत असून, राणे साहेबांच्या शब्दाला वजन असल्यामुळेच अनेक वर्षांनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत मिळाली आहे. शेतकऱ्यांचा खरा कैवारी कोण याचे उत्तर या निर्णयातून संपूर्ण जिल्ह्याला मिळाले आहे.
पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदार निलेश राणे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत थेट कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना सभागृहात धारेवर धरले. छापील शासकीय माहिती आणि बागायतदारांची प्रत्यक्ष जमिनीवरील भीषण स्थिती, कृषी विद्यापीठांनी केलेला अधिकृत सर्व्हे या सर्व मुद्यांवर त्यांनी अभ्यासपूर्ण व बेधडक शैलीत वस्तुस्थिती मांडली. आ. राणे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे संपूर्ण सभागृह हलवून निघाले. परिणामी, अवघ्या १२ तासांच्या आत राज्य शासनाने तातडीने आद्यादेश म्हणजेच शासन निर्णय जारी करत कोट्यवधींच्या मदतीवर शिक्कामोर्तब केले. यामुळे दीर्घकाळ नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या कोकणातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या शासन निर्णयानुसार ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत पडलेली कडाक्याची थंडी आणि अवेळी झालेल्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून इनपुट सबसिडी स्वरूपात मदत दिली जाणार आहे. ही मदत शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार प्रती हेक्टर २२ हजार ५०० रुपये दराने वितरित केली जाणार असून, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी प्रणालीद्वारे जमा केली जाईल. या निर्णयाचा लाभ ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील पाच जिल्ह्यांतील १ लाख ३४ हजार २५१ शेतकऱ्यांना होणार असून एकूण ९२ हजार ३४२.७८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान यासाठी ग्राह्य धरण्यात आले आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९८.४४ कोटी रुपये, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ७९.०५ कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
कोकणात २०१३ नंतरची अशा प्रकारची ही पहिलीच मोठी नुकसानभरपाई आंबा-काजू उत्पादकांना मिळाली आहे. खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचा त्रिसुत्री पाठपुरावा आणि प्रयत्न अखेर यशस्वी ठरले असून, त्यांनी निवडणूक आणि जाहीर सभांमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. आमदार निलेश राणे यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेतल्यानंतर अवघ्या काही तासांत शासन निर्णय जाहीर झाल्याने संपूर्ण कोकणातून आमदार निलेश राणे यांच्या अभ्यासू आणि बेधडक नेतृत्वावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

