आमदारांची टीका म्हणजे स्वतःचे अपयश लपवण्याचा प्रयत्न; गुरुदास गवंडे उपसभापतींच्या बाजूने मैदानात
सावंतवाडी, दि.२०: पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांना स्थानिक प्रश्नांची आणि प्रशासनाची पूर्ण जाण असल्यामुळेच त्यांनी ते वक्तव्य केले आहे. जर त्यांच्या या विधानामुळे आमदारांची अस्वस्थता वाढली असेल, तर त्यात उपसभापतींची चूक नसून मतदारसंघातील दाहक वस्तुस्थितीच आमदारांना टोचत आहे, असा थेट हल्लाबोल माजी सरपंच सेवा संघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केला आहे. गौरव मुळीक यांच्या भूमिकेचे जाहीर समर्थन करत त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
गुरुदास गवंडे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, गेल्या चार महिन्यांत उपसभापती म्हणून गौरव मुळीक यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. मतदारसंघातील ‘फाइव्ह स्टार’ हॉटेल्सना पाणी पुरवण्यापेक्षा जनतेचे रखडलेले प्रश्न सोडवणे अधिक गरजेचे आहे. आज जलजीवन मिशनमधील घोटाळ्यांमुळे अनेक वर्षे कामे ठप्प पडली आहेत आणि या गंभीर विषयावर मुळीक यांनी नेमके बोट ठेवले आहे. तसेच गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेला तळवणे येथील कातकरी समाजाचा अत्यंत संवेदनशील प्रश्न मुळीक यांनी ताकदीने सोडवून आपली कार्यक्षमता दाखवून दिली आहे. अशा धडाडीच्या लोकप्रतिनिधीच्या ज्ञानावर टीका करणे किंवा त्यांच्या क्षमतेवर शंका घेणे अत्यंत चुकीचे आहे.
गौरव मुळीक यांच्या कामाचा धडाका हा त्यांच्या पाठीशी असलेल्या चांगल्या राजकीय गुरूंमुळे आहे, असे सांगताना गवंडे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
आज सावंतवाडी तालुक्यातील अनेक महत्त्वाचे प्रश्न केवळ लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे जैसे थे असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सावंतवाडी पंचायत समिती प्रशासनाने तालुक्याचे प्रश्न मांडण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी दोन वेळा आमसभा घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, मात्र त्याला लोकप्रतिनिधींकडून अजिबात दाद दिली गेली नाही, अशी खंत गवंडे यांनी व्यक्त केली. मतदारसंघातील जनतेचे प्रश्न केवळ पत्रकार परिषदा किंवा प्रसिद्धीच्या माध्यमातून सुटत नसून, लोकांचा हा प्रलंबित प्रश्नांविषयीचा तीव्र आक्रोश आगामी आमसभेतून लोकप्रतिनिधींना नक्कीच दिसेल, असा इशाराही गुरुदास गवंडे यांनी शेवटी दिला आहे.

