Site icon Kokandarshan

फाईव्ह स्टार हॉटेलला पाणी देण्यावरून सावंतवाडीत ठिणगी; केसरकर-मुळीक वादात अवनी राऊळ यांची उडी..

गौरव मुळीक यांची भूमिकाच योग्य, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर! : पंचायत समिती सदस्य सौ.अवनी राऊळ

सावंतवाडी, दि. १९:
तिलारी धरणाचे हक्काचे पाणी फाईव्ह स्टार हॉटेलला देण्याचा घाट आणि तालुक्याची रखडलेली आमसभा या मुद्द्यांवरून सावंतवाडीतील राजकीय वातावरण कमालीचे पेटले आहे. जनसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरून आमदार दीपक केसरकर आणि पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांच्यात जोरदार ‘कलगीतुरा’ रंगला असतानाच, आता या वादात माडखोल मतदारसंघाच्या धडाडीच्या पंचायत समिती सदस्य सौ. अवनी अमित राऊळ यांनी थेट उडी घेतली आहे. “उपसभापती गौरव मुळीक यांनी जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी मांडलेली भूमिका शंभर टक्के योग्यच आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण ताकदीनिशी गौरव मुळीक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार,” अशी आक्रमक आणि रोखठोक भूमिका सौ. अवनी राऊळ यांनी घेतली आहे. त्यांनी ‘कोकण दर्शन डिजिटल मीडिया’ या चॅनलशी विशेष संवाद साधताना उपसभापतींना आपले जाहीर समर्थन घोषित केल्यामुळे या राजकीय वादाला आता अत्यंत महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

या हायव्होल्टेज राजकीय संघर्षाची ठिणगी आज आमदार दीपक केसरकर यांच्या पत्रकार परिषदेने पडली. प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार केसरकर यांनी उपसभापती गौरव मुळीक यांच्या प्रशासकीय अनुभवावर बोट ठेवत त्यांच्यावर बोचरी टीका केली. उपसभापतींना नेमके ज्ञान किती आहे, हे मला माहिती नाही, ते सध्या या पदावर नवीन आहेत; त्यामुळे त्यांना नेमकी काय वस्तूस्थिती आहे याची सविस्तर माहिती मी स्वतः करून देतो, असा खोचक टोला आमदार केसरकर यांनी लगावला होता. मात्र, आमदारांच्या या अनुभवाच्या दाव्याला उपसभापती गौरव मुळीक यांनीही तितक्याच आक्रमकतेने आणि आत्मविश्वासाने चोख प्रत्युत्तर दिले. तुम्ही आधी तालुक्याची प्रलंबित असलेली आमसभा लावून दाखवाच, आम्ही थेट त्या आमसभेतच तुम्हाला जनतेच्या समोर काय ते चोख उत्तर देऊ, असा थेट पलटवार मुळीक यांनी केसरकरांवर केला.

दोघांमधील हा कलगीतुरा आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच, माडखोलच्या पंचायत समिती सदस्य अवनी अमित राऊळ यांनी घेतलेल्या मुळीक यांच्या बाजूच्या खंबीर भूमिकेमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे ढवळून निघाली आहेत. मुळीक यांनी स्थानिक जनतेच्या पाण्याच्या हक्कासाठी घेतलेला पवित्रा अगदी योग्य असल्याचे सांगत अवनी राऊळ यांनी थेट आमदारांच्या विरोधात उपसभापतींना आपली जाहीर साथ दिली आहे. आमदार विरुद्ध उपसभापती अशा रंगलेल्या या थेट संघर्षात आगामी काळात होणारी आमसभा तिलारीच्या पाण्याच्या मुद्द्यावरून कमालीची वादळी ठरणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version