Site icon Kokandarshan

सावंतवाडीत ‘ओंकार’ हत्तीचा धुमाकूळ; इन्सुली, वाफोली व वेत्ये परिसरात भीतीचे वातावरण

भातशेती पेरणीच्या तोंडावर फळबागांसह वाहनांचे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची वेत्ये सरपंचांची वनविभागाकडे मागणी

सावंतवाडी, दि.०८: माजगाव वनपरिक्षेत्रातील इन्सुली, वाफोली, वेत्ये आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून ‘ओंकार’ नावाच्या हत्तीचा वावर कमालीचा वाढला असून, या हत्तीने परिसरात प्रचंड धुमाकूळ घातला आहे. हत्तीच्या या वाढत्या वावरामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वन्यप्राण्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान केले असून, फळबागां सोबतीनेच ग्रामस्थांची दुचाकी व चारचाकी वाहने आणि इतर खाजगी मालमत्तेचीही मोठी हानी केली आहे.

सध्या खरीप हंगामातील भातशेती पेरणीचे दिवस जवळ येत असून शेतकरी कामांच्या तयारीत आहेत. मात्र, अशा ऐन हंगामाच्या तोंडावरच हत्तीचा उपद्रव वाढल्याने शेतकरी वर्ग अत्यंत चिंतेत सापडला असून हवालदिल झाला आहे. आधीच विविध आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या बळीराजाला या जंगली हत्तीने केलेल्या नुकसानीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने आणि वनविभागाने तात्काळ नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना नियमानुसार योग्य ती नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी आता सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत वेत्ये ग्रामपंचायतीचे सरपंच गुणाजी अर्जुन गावडे यांनी माजगाव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करण्याची आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून वनविभागाने क्षेत्रात ठोस व प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे. भातशेतीची पेरणी पूर्णपणे सुरू होण्यापूर्वीच वनविभागाने या हत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा आगामी काळात शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे मोठे नुकसान होईल, असा इशाराही सरपंच गुणाजी गावडे यांनी यावेळी दिला. आता शेतकऱ्यांचे आर्थिक गणित धोक्यात आणणाऱ्या या गंभीर प्रश्नाकडे वनविभाग किती तत्परतेने लक्ष देतो आणि हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी काय पावले उचलतो, याकडे संपूर्ण परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version