Site icon Kokandarshan

ओटवणे देऊळवाडीत शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न; भाजपा युवानेते विशाल परब यांच्याकडून सभामंडप व हायमास्टचे आश्वासन

विशाल परब आणि ॲड. अनील निरवडेकर यांच्या उपस्थितीत शिवरायांना दुग्धाभिषेक; संपूर्ण परिसर झाला ‘शिवमय’

सावंतवाडी, दि.०६:
महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे (देऊळवाडी) येथे सिंहासनाधिष्ठित शिवरायांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले. हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला असून, या निमित्ताने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून भाजपा युवानेते विशाल प्रभाकर परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनील निरवडेकर, भाजपा युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपनगराध्यक्ष ॲड. अनील निरवडेकर आणि विशालजी परब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा इतिहास आणि स्वराज्य निर्मितीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाचा उजाळा दिला. आजच्या तरुण पिढीने शिवरायांचे विचार केवळ लक्षात न ठेवता ते आपल्या जीवनात आत्मसात करण्याची अत्यंत गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात पुढे बोलताना आणि ग्रामस्थांना आश्वासित करताना युवानेते विशाल परब म्हणाले की, ज्याप्रमाणे ओटवणे येथील श्री देव रवळनाथ मंदिरासमोर सभामंडप उभारण्यासाठी सहकार्य केले, त्याच धर्तीवर या ठिकाणीही भव्य सभामंडप उभारण्यासाठी आणि परिसरात हायमास्ट लाईट उपलब्ध करून देण्यासाठी आपण पूर्ण सहकार्य करू. त्यांच्या या महत्वपूर्ण घोषणेनंतर उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात या निर्णयाचे स्वागत केले.

या कार्यक्रमासाठी वैभव भानसे यांनी आपली जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली होती. या प्रसंगी भाजपा सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, माजी पोलिस पाटील तुकाराम गावकर, ओटवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. होडावडेकर, चेतन गावकर, धिरेंद्र म्हापसेकर, रामा गावकर, चंद्रकांत गावकर, विजय कविटकर, नारायण भानसे यांच्यासह परिसरातील शिवप्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवराज्याभिषेक दिनाच्या या सोहळ्यामुळे ओटवणे परिसरातील शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, महाराजांच्या विचारांचा जागर पुन्हा एकदा करण्यात आला.

Exit mobile version