Site icon Kokandarshan

सावंतवाडीत स्वामी भक्तीचा महासागर; ‘श्री औदुंबर स्वामी मंदिरात’ पवित्र पादुकांचे उत्साहात पूजन.!

सैनिक बँकेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ यांना पूजेचा मान; अन्नदान करून स्वामी भक्ती करण्याचे गुरु माऊलींचे आवाहन.

सावंतवाडी, दिनांक २९: येथील पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या  “श्री औदुंबर स्वामी मंदिरात” नुकताच एक अपूर्व आणि भक्तीमय सोहळा संपन्न झाला. श्री स्वामी समर्थ महाराज स्थापित गुरुमंदिर आणि श्री बाळाप्पा महाराज दिव्य गुरु परंपरेचा आशीर्वाद लाभलेल्या स्वामींच्या पवित्र पादुकांचे अत्यंत उत्साही वातावरणात पूजन करण्यात आले. या सोहळ्यात मुख्य पूजेचा बहुमान सैनिक बँकेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ यांना मिळाला. या मंगलप्रसंगी उपस्थित असलेले गुरु आनंद ब्रह्म यांनी भाविकांना मोलाचे मार्गदर्शन करताना, प्रत्येकाने समाजसेवा आणि अन्नदान यांसारखी सत्कर्मे करून स्वामी भक्तीचा वारसा पुढे चालवावा, असे आवाहन आपल्या आशीर्वचनात केले.

या सोहळ्याच्या निमित्ताने सिंधुदुर्गातील स्वामी भक्तांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली होती. प्राचीन अग्नी-उपासनामार्ग पुनरुज्जीवित करणारे “परमसद्गुरु श्री गजानन महाराज” यांच्या चिन्मयपादुका तब्बल तीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या भागात परिक्रमेसाठी आल्या होत्या. या पवित्र चिन्मय पादुकांचे दर्शन आणि पूजन करण्यासाठी भाविकांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली होती.

या धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळ्याला सावंतवाडीतील अनेक प्रशासकीय अधिकारी, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. यात प्रामुख्याने उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल चव्हाण, सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, जिल्हा बँकेचे संचालक रवी मडगावकर, माजी नगरसेवक गुरु मठकर, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, दीपक म्हापसेकर आणि रंजना निर्मळ आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच हा सोहळा यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अमोल टेंबकर, भुवन नाईक, अनिकेत आसोलकर, सचिन मोरजकर, हेमंत पांगम, आनंद काष्टे, प्रणव तारी, यश गाटे, केतन सावंत, ओम टेंबकर, अमित राऊळ, अदिती सावंत, सुरेखा पवार, पुजा धोत्रे यांच्यासह परिसरातील शेकडो महिला व पुरुष स्वामी भक्तांनी परिश्रम घेतले. संपूर्ण परिसर ‘श्री स्वामी समर्थ’ आणि ‘जय गजानन’ यांच्या जयघोषाने आणि धूप-दीपांच्या सुवासाने न्हाऊन निघाला होता.

Exit mobile version