“तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांची नार्को टेस्ट करा”,..अन्यथा ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा थेट इशारा
सावंतवाडी, दि.२९: दोडामार्ग एमआयडीसी परिसरातील कथित खनिज सदृश माती चोरी प्रकरणाने आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संगनमताचा गंभीर आरोप करत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज सावंतवाडी येथे प्रशासनावर अक्षरशः तोफ डागली. तब्बल महिना-सव्वा महिना आठ ते दहा एकर परिसरात सुरू असलेला हा बेकायदेशीर माती उपसा स्थानिक प्रशासनाच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नाही, असा थेट आरोप करत संबंधित तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांची तात्काळ नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी खळबळजनक मागणी त्यांनी केली. सावंतवाडी येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजू परब यांनी दोडामार्ग एमआयडीसीतील कथित घोटाळ्यावर संतप्त शब्दांत प्रहार केला. यावेळी युवा सेना तालुका प्रमुख क्लॅट्स फर्नांडिस उपस्थित होते.
परब पुढे म्हणाले की, एमआयडीसी परिसरात काहींनी प्लॉट घेतले असले तरी प्लॉट डेव्हलपमेंटच्या नावाखाली खनिज सदृश मातीचा सर्रास बेकायदेशीर उपसा करण्यात आला. तब्बल आठ ते दहा एकर जमीन खोदून माती चाळली गेली, ट्रकच्या ट्रक बाहेर गेले, आणि प्रशासन मात्र आंधळं, बहिरं आणि मुग गिळून गप्प बसलं. हा प्रकार केवळ संशयास्पद नाही, तर थेट भ्रष्ट संगनमताचा पुरावा आहे. ही फक्त माती चोरी नसून हा कोट्यवधींच्या नैसर्गिक संपत्तीचा संगनमताने झालेला डल्ला आहे. गावपातळीवर पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यंत्रणा कार्यरत असताना एवढा मोठा प्रकार त्यांच्या नजरेआड कसा गेला, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. गावात सुरू असलेल्या प्रत्येक हालचालीची माहिती पोलीस पाटलाने पोलीस निरीक्षकांना देणे कायदेशीर बंधनकारक असते, मग एवढ्या मोठ्या प्रमाणातील उत्खननाची माहिती प्रशासनाला नव्हती का, की माहिती असूनही अर्थपूर्ण तडजोडीतून डोळेझाक करण्यात आली, असा घणाघाती आरोप परब यांनी केला.
स्थानिक ग्रामस्थांकडून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी माहिती घेतली असता, हा माती उपशाचा काळाबाजार गेल्या महिना-सव्वा महिन्यापासून सुरू असल्याचे समोर आले असल्याचे त्यांनी सांगितले. या गंभीर प्रकरणाची माहिती आपण दोन दिवसांपूर्वीच उद्योगमंत्री उदय सामंत यांना व्हॉट्सअॅपद्वारे दिली असल्याचे सांगत, मुंबई दौऱ्यावर असल्यामुळे तातडीने लक्ष घालता आले नाही; मात्र आता या भ्रष्ट टोळीचा पर्दाफाश केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पत्रकार आणि प्रसारमाध्यमांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतरही महसूल किंवा पोलीस प्रशासनाने अद्याप कोणताही ठोस पंचनामा किंवा गुन्हा दाखल केला नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही चोरी नेमकी कुठे गेली आणि यामागे कोणते रॅकेट आहे, हे शोधायचे असेल तर आधी तहसीलदार आणि पीआयची नार्को टेस्ट करा, मग दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होईल, असे परब यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, या प्रकरणात तात्काळ गुन्हे दाखल करून मुख्य सूत्रधारांना अटक न केल्यास “शिवसेना स्टाईल” आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा देत संजू परब यांनी प्रशासनाला अखेरचा इशारा दिला आहे.

