अज्ञात विकृताच्या वादग्रस्त पोस्टविरोधात बांदा पोलिसांत तक्रार; सात दिवसांत पुरावे देण्याचे आव्हान
सावंतवाडी, दि.२७: “इन्सुलीत वाळू उपसा दिसत नाही का?, की हप्ते घेतात?” अशा शब्दांत सोशल मीडियावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह आणि बदनामीकारक पोस्टमुळे इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य नितीन राऊळ कमालीचे संतप्त झाले आहेत. याप्रकरणी त्यांनी आता थेट कायदेशीर लढाई लढण्याचा पवित्रा घेतला असून अज्ञात व्यक्तीविरोधात बांदा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. संबंधित संशयित आरोपीचा तातडीने शोध लावून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
काही दिवसांपूर्वी वाफोली येथे बेकायदेशीररित्या वाळूचे उत्खनन सुरू असल्याबाबत स्थानिक ग्रामस्थ विठ्ठल कळंगुटकर यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने नितीन राऊळ यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली होती. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत राऊळ यांनी तत्काळ सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना या प्रकाराची माहिती दिली. प्रशासनानेही या माहितीच्या आधारे त्वरित हालचाली करत घटनास्थळावरून अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर आणि उत्खनन करणारी जेसीबी मशीन ताब्यात घेतली. मात्र, अवैध धंद्याविरोधात केलेल्या या जनहिताच्या कारवाईचा राग मनात धरून राऊळ यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले.
प्रशासकीय कारवाई पूर्ण झाल्यानंतर अचानक सोशल मीडियावर एक वादग्रस्त मेसेज वेगाने व्हायरल करण्यात आला. “डंपर आणि जेसीबी पकडून तहसीलदारांच्या ताब्यात देणे चुकीचे असून, त्यावरील दंडात्मक कारवाईची सर्व जबाबदारी विठ्ठल कळंगुटकर आणि नितीन राऊळ यांनी घ्यावी,” असा मजकूर या पोस्टमध्ये लिहिण्यात आला होता. इतक्यावरच न थांबता, “इन्सुलीत सुरू असलेला वाळू उपसा दिसत नाही का?, की हप्ते घेतात?” असा थेट आणि गंभीर आरोप करत नितीन राऊळ यांच्या राजकीय व सामाजिक प्रतिमेला जाणीवपूर्वक धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला.
आपल्या प्रामाणिक कामावर चिखलफेक झाल्याचे पाहून संतप्त झालेल्या नितीन राऊळ यांनी थेट बांदा पोलीस ठाणे गाठले. त्यांनी पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. सायबर सेलच्या माध्यमातून या अज्ञात समाजकंटकाचा शोध घेण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. दरम्यान, जाहीर इशारा देताना नितीन राऊळ म्हणाले की, जर पुढील सात दिवसांच्या आत संबंधित व्यक्तीने पुराव्यासहित आपण कोणाकडून आणि कधी हप्ते घेतले हे सिद्ध केले नाही, तर न्यायालयात जाऊन संबंधितांवर अधिकृतपणे अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. या सर्व प्रकारामुळे आता सावंतवाडी तालुक्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

