सावंतवाडी, दि.२०: गाव करेल ते राव काय करेल या उक्ती प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरशिंगे गावातील अब्जावधी रुपयांची सामाईक जमीन हडपण्याचा भूमाफियांचा डाव तूर्तास तरी ग्रामस्थांनी यशस्वीपणे उधळून लावला आहे. गावातील सर्व्हे नं. ३२, ३३, ३४, २० आणि ९९ या जैवविविधतेने नटलेल्या सामाईक क्षेत्रातील जमिनी दलाल आणि काही महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने बेकायदेशीरपणे खरेदी-विक्री केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आज, २० मे रोजी ठरवलेली जमीन मोजणी रोखण्यासाठी गावातील तरुण, महिला आणि मुंबई-पुण्याहून आलेले चाकरमानी मोठ्या संख्येने एकत्र आले होते.
६९१ हेक्टरहून अधिक विस्तृत क्षेत्र असलेल्या या जमिनीवर ८५० हून अधिक सहभागधारकांची सामाईक मालकी आहे. गरीब शेतकऱ्यांना आमिष दाखवून आणि इतर भागीदारांना कोणतीही पूर्वसूचना न देता नियमबाह्य पद्धतीने ही खरेदीखते करण्यात आली असल्याचा आरोप करत या अन्यायाविरोधात गावकऱ्यांनी आधीच तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन दिले होते. आज मोजणीसाठी शासकीय अधिकारी गावात दाखल होताच, सरपंच दीपक राऊळ, माजी सरपंच नारायण राऊळ, माजी उपसरपंच पांडुरंग राऊळ, पोलिस पाटील गणू राऊळ, सामाजिक कार्यकर्ते गणपत राणे, आदी गांवकर मंडळी यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांना घेराव घातला. गावकऱ्यांचा तीव्र विरोध आणि वाढता रोष पाहून अधिकाऱ्यांना मोजणी न करताच गावातून माघारी फिरावे लागले. ग्रामस्थांच्या या एकजुटीमुळे तूर्तास तरी भूमाफियांचा डाव उधळला गेला असून संपूर्ण तालुक्यात या धाडसी पावलाचे कौतुक होत आहे.

