वेंगुर्ला,दि.१८: आरवली येथे पारंपरिक बैलगाडा शर्यतीचा थरार प्रचंड उत्साहात पार पडला. श्री देव वेतोबा, सातेरी, भुमैया कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील भाजप युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे एक विशेष रंगत प्राप्त झाली होती. ग्रामीण संस्कृतीचे वैभव असलेल्या या शर्यतीचा आनंद घेण्यासाठी सखेलखोल परिसरामध्ये क्रीडाप्रेमींनी आणि ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती.
या अटीतटीच्या शर्यतीचे उद्घाटन आरवलीचे ज्येष्ठ ग्रामस्थ भाई उर्फ रघुवीर मंत्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले, तर भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते फित कापून स्पर्धेची रीतसर सुरुवात झाली. याप्रसंगी परब यांच्यासोबत भाई उर्फ रघुवीर मंत्री, आरवलीचे सरपंच शेखर कुडव, तलाठी गावडे, मयुर आरोलकर, श्रीकांत राजाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत सिंधुदुर्ग आणि परिसरातील सुमारे ५० हून अधिक बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता, ज्यामुळे मैदानावर कमालीची उत्सुकता आणि रोमांचक वातावरण निर्माण झाले होते.
या संपूर्ण स्पर्धेत पावशी येथील वाटवे यांच्या मालकीची विजयी जोडी प्रेक्षकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या जोडीने आपल्या अफाट वेगाच्या जोरावर अवघ्या १ मिनिट ७ सेकंदात ६०० मीटरचे अंतर यशस्वीपणे पूर्ण करत मैदान मारले आणि उपस्थित हजारो प्रेक्षकांची मने जिंकली. या पारंपरिक बैलगाडा शर्यतीचा थरार डोळ्यात साठवण्यासाठी संपूर्ण परिसर अबालवृद्धांच्या अलोट गर्दीने आणि उत्साहाने गजबजून गेला होता.

