Site icon Kokandarshan

महावितरणच्या गलथान कारभाराचा पाटील कॉम्प्लेक्स परिसरातील नागरिकांना मोठा फटका; विद्युत उपकरणे जळून लाखोचे नुकसान

पावसाळ्यापूर्वीच विजेचा लपंडाव सुरू; महावितरणने कारभार न सुधारल्यास जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा इशारा

सावंतवाडी,दि.११: शहरातील पाटील कॉम्प्लेक्स डीपी परिसरात सोमवारी अचानक वाढलेल्या वीज दाबामुळे (हाय व्होल्टेज) परिसरातील नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे महावितरणचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, संतप्त नागरिकांच्या भावनांना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी वाचा फोडली आहे. महावितरणने आपला कारभार वेळीच सुधारावा, अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सोमवारी शहरात दुरुस्तीच्या नावाखाली दिवसभर वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र, सायंकाळी वीज पुरवठा सुरळीत होत असताना अचानक दाबात वाढ झाल्याने अनेकांचे टीव्ही, फ्रीज, एअर कंडिशनर्स आणि इतर महागडी विद्युत उपकरणे जळून खाक झाली. मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हात आधीच नागरिक उकाड्याने हैराण असताना, त्यात आता आर्थिक नुकसानीची भर पडल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या परिस्थितीवर भाष्य करताना बबन साळगावकर म्हणाले की, “महावितरण सध्या कंत्राटी पद्धतीवरील कामगारांच्या जीवावर आपला कारभार हाकत आहे. मात्र, या कामगारांवर कोणाचेही प्रभावी पर्यवेक्षण (सुपरव्हिजन) राहिलेले नाही. दुरुस्तीच्या नावाखाली तासनतास वीज घालवली जाते, पण प्रत्यक्षात कामाचा दर्जा शून्य आहे. रात्री-अपरात्री वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. एका बाजूला डासांचा प्रादुर्भाव आणि दुसऱ्या बाजूला असह्य उकाडा यामुळे लहान मुले आणि वृद्ध नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.”

पावसाळ्यापूर्वीच ही स्थिती, तर पावसाळ्यात काय?
पावसाळा अद्याप सुरू झालेला नसतानाही जर विजेची अशी दुरवस्था असेल, तर प्रत्यक्ष पावसाळ्यात जनतेला कोणत्या संकटांना सामोरे जावे लागेल, असा गंभीर प्रश्न साळगावकर यांनी उपस्थित केला आहे. मे महिन्यातील प्रखर उन्हामुळे नागरिक आधीच त्रस्त असताना महावितरणच्या या नियोजित आणि अनियोजित वीज कपातीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

महावितरणने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सुधारणा करावी आणि ज्या नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे, त्याबाबत योग्य ती पावले उचलावीत. जर वीज वितरण कंपनीने आपली कार्यपद्धती बदलली नाही, तर जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असेही बबन साळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Exit mobile version