अपघातांच्या सत्राने नागरिक भयभीत; अपघातप्रवण क्षेत्रात कायमस्वरूपी पोलीस नेमण्याची मागणी
सावंतवाडी,दि.११: वेंगुर्ला-बेळगाव मार्गावर चिरे आणि वाळूची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या अतिवेगामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. शनिवारी कोलगाव येथे झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जण गंभीर जखमी झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, कोलगावचे सरपंच संतोष राऊळ यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन, मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या या बेफाम चालकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या मार्गावरून धावणारे ट्रक आणि डंपर चालक अनेकदा मद्यधुंद अवस्थेत किंवा अंमली पदार्थांच्या नशेत वाहने चालवत असल्याचे समोर आले आहे. या नशेत असलेल्या चालकांमुळेच रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असून, वेगावर नियंत्रण नसल्याने निष्पाप लोकांचे संसार उघड्यावर पडत आहेत. आंबोली घाटातील चिमुकलीचा अपघाती मृत्यू आणि आता कोलगावमध्ये झालेली घटना, हे सर्व प्रकार प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच घडत असल्याचा आरोप संतोष राऊळ यांनी केला आहे.
केवळ दंडात्मक कारवाई करून न थांबता, या मार्गावर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करावेत जेणेकरून वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचक बसेल, असेही राऊळ यांनी सुचवले आहे. वाढत्या अपघातांमुळे अंगावर काटा येणाऱ्या या घटनांना वेळीच रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी विनंती त्यांनी या निवेदनातून केली आहे.

