प्रशासनाच्या प्रतीक्षेत न थांबता ‘रिअल हिरो’चा पुढाकार; सर्वोदय नगरवासीयांना मिळाला मोठा दिलासा
सावंतवाडी, दि.२७: शब्दांपेक्षा कृती मोठी असते, याचा जिवंत प्रत्यय सावंतवाडीतील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते ॲड. रुजूल पाटणकर यांनी आज पुन्हा एकदा शहरवासीयांना घडवून दाखवला आहे. शहरातील सर्वोदय नगरातील रस्त्यांची दुरवस्था पाहून केवळ प्रशासनावर टीका करत न बसता, त्यांनी थेट कृतीचा मार्ग निवडला. ररस्त्यांवरील धोकादायक खड्डे स्वखर्चाने बुजवून त्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सर्वोदय नगर ते शिक्षक कॉलनी परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. हे खड्डे अपघातांना आमंत्रण देत असल्याने वाहनधारक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचे पाहून, ॲड. पाटणकर यांनी कोणाचीही वाट न पाहता स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी स्वखर्चाने साहित्य मागवून हे धोकादायक खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. त्यांच्या या तत्परतेमुळे परिसरातील रस्ते आता सुरक्षित झाले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने योगदान देणारे ॲड. पाटणकर यांनी या निमित्ताने आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा जपली आहे. आपल्या या उपक्रमाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “रस्त्यांवरील खड्डे हे अपघाताचे मुख्य कारण ठरू शकतात आणि त्यातून कोणाचाही जीव जाणे क्लेशदायक असते. समाजाचे काहीतरी देणे लागतो, याच भावनेतून मी हा छोटासा प्रयत्न केला आहे.”
ॲड. पाटणकर यांच्या या कार्यामुळे सर्वोदय नगर आणि शिक्षक कॉलनीतील रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. केवळ समस्यांवर भाष्य करणाऱ्यांच्या गर्दीत, स्वतः मैदानात उतरून समस्या सोडवणारा चेहरा म्हणून ॲड. रुजूल पाटणकर आज सावंतवाडीकरांसाठी खऱ्या अर्थाने ‘रिअल हिरो’ ठरले आहेत.

