Site icon Kokandarshan

आंबा विक्रेत्या महिलांवरील कारवाई थांबवून स्वतंत्र बाजारपेठ द्या; माजी नगरसेवक विलास जाधव यांची मागणी

सावंतवाडी,दि.१६: सावंतवाडी शहरात ग्रामीण भागातून आंबे विक्रीसाठी येणाऱ्या महिलांवर नगरपरिषदेकडून होणाऱ्या कारवाईच्या विरोधात आता आवाज उठू लागला आहे. माजी नगरसेवक विलास जाधव यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे या महिलांची व्यथा मांडत, त्यांना हुसकावून लावण्याऐवजी त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली आहे. ग्रामीण भागातील अनेक कष्टकरी महिला आपल्या बागेत पिकवलेले आंबे घेऊन दरवर्षी हंगामी स्वरूपात सावंतवाडी बाजारपेठेत विक्रीसाठी येतात. या दोन महिन्यांच्या कालावधीवरच त्यांची मोठी उपजीविका अवलंबून असते. मात्र, शहरात हक्काची जागा उपलब्ध नसल्याने या महिला मिळेल त्या ठिकाणी बसून आपला व्यवसाय करतात. अशा वेळी नगरपरिषदेकडून त्यांच्यावर होणारी कारवाई अन्यायकारक असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

आधीच अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात महिला विक्रेत्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई करणे चुकीचे आहे, अशी भूमिका विलास जाधव यांनी मांडली. या समस्येवर तोडगा म्हणून आठवडा बाजाराच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात दोन महिन्यांसाठी स्वतंत्र “आंबा बाजारपेठ” उभारण्यात यावी, जेणेकरून या महिलांना अधिकृतपणे आणि सन्मानाने आपला व्यवसाय करता येईल, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले आणि सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी तातडीने निर्णय घ्यावा आणि कष्टकरी महिलांना दिलासा द्यावा, असे आवाहनही विलास जाधव यांनी यावेळी केले आहे.

Exit mobile version