सावंतवाडी,दि.२३: नाशिक येथील कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरणात सावंतवाडीचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री दीपक केसरकर यांचे नाव आल्याने व त्यांचे फोटो प्रसिद्ध झाल्यामुळे सावंतवाडीची मान संपूर्ण महाराष्ट्रात शरमेने खाली गेली आहे. हे प्रकरण अतिशय चिंतेचे आणि लाजिरवाणे असून यामुळे मतदारसंघाची मोठी बदनामी झाली आहे. या प्रकरणाची निष्पक्षपणे एसआयटीद्वारे चौकशी होईपर्यंत आमदार दीपक केसरकर स्वतःहून आपला राजीनामा देणार का, असा थेट सवाल सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून अशोक खरात याचे नाव भोंदूगिरी, स्त्रीलंपटपणा आणि गरिबांच्या जमिनी बळकावणे अशा गंभीर आरोपांसाठी विविध व्हिडिओ व फोटोंच्या माध्यमातून सर्वत्र प्रसिद्ध होत आहे. या प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांच्या खास भक्त असलेल्या रुपाली चाकणकर यांनी एक स्त्री असूनही नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा तातडीने राजीनामा दिला आहे. मात्र, विविध वृत्तवाहिन्यांवरून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या आणि फोटोंमध्ये २८८ आमदारांपैकी केवळ सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचेच नाव ‘खास भक्त’ म्हणून प्रामुख्याने पुढे येत असल्याने सावंतवाडीकरांसाठी ही बाब अत्यंत लज्जास्पद ठरली आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होण्यासाठी मुख्यमंत्री केसरकरांचा राजीनामा घेणार की आमदार स्वतःहून तो देणार, की पूर्वीच्या पवई एन्काउंटर प्रकरणाप्रमाणे केसरकरांना पुन्हा क्लीनचीट मिळणार, असा संतप्त सवालही वंजारी यांनी केला आहे.
यापूर्वी देखील आमदार केसरकर यांच्या बुवाबाजीच्या दंतकथा सावंतवाडी परिसरात चर्चिल्या जात होत्या, त्या आता खऱ्या आहेत की काय असा प्रश्न जनतेला पडू लागला आहे. त्यातच, सावंतवाडी विधानसभेसाठी निधी देण्याऐवजी नाशिक आणि सिन्नर भागातील रस्त्यांसाठी निधी दिला जात असल्याची कुजबुज सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. जर असे असेल तर सावंतवाडीकरांनी विकासासाठी कोणाकडे पाहायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ निवडणुकीपुरते सावंतवाडीत थांबायचे आणि नंतर मतदारसंघाला पोरके करायचे अशी मनोवृत्ती असलेल्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार, अशी टीकाही त्यांनी केली. हे प्रकरण अतिशय गंभीर असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी यात तातडीने लक्ष घालून केसरकरांचा राजीनामा मागावा किंवा त्यांनी स्वतःहून राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे, तरच मतदारसंघातील नागरिक म्हणून आम्हाला अभिमान वाटेल. अन्यथा, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने या विरोधात मोठे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा सौ. साक्षी वंजारी यांनी दिला आहे.

