Site icon Kokandarshan

न्यूनगंड सोडून आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जा: प्रा. रुपेश पाटील यांचे आवाहन

आरपीडी कनिष्ठ महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा; करिअरच्या संधींवर मार्गदर्शन

सावंतवाडी, दि.०१: “जर आपल्याला इंग्रजी बोलता येत नसेल तर अजिबात मनात न्यूनगंड बाळगू नका. जगातील अनेक विदेशी लोकांनाही इंग्रजी येत नाही, मात्र ते आपल्या मातृभाषेचा प्रभावी वापर करून जीवनात यशस्वी होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात भाषेचा न्यूनगंड न बाळगता पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जावे, यश नक्कीच मिळेल,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी केले. शहरातील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (आरपीडी) येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन आणि करिअरच्या संधी’ या विषयावरील विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रा. पाटील यांनी आपल्या व्याख्यानात मराठी भाषेतील करिअरच्या विविध वाटांवर प्रकाश टाकला. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात १९,५०० पेक्षा अधिक मातृभाषा बोलल्या जातात, ज्यात मराठीचा वाटा मोठा आहे. मराठी भाषेत उच्च शिक्षण घेऊन नेट-सेट सारख्या परीक्षांद्वारे प्राध्यापक होता येते, तसेच पत्रकारिता, न्यूज रिपोर्टिंग, आकाशवाणी उद्घोषक, अनुवादक, आणि चित्रपट-मालिका लेखनात मोठ्या संधी आहेत. इतकेच नव्हे तर डिजिटल युगात कंटेंट रायटिंग, युट्युब स्क्रिप्ट रायटिंग आणि मराठी ब्लॉगिंग यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतही मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असलेल्या तरुणांना मोठी मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मुख्याध्यापिका सौ. संप्रवी कशाळीकर यांनी व्यवहारी जीवनात मराठीचा जास्तीत जास्त वापर करून आपली अस्मिता टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. उपप्राचार्य डॉ. सुमेधा धुरी यांनी कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही प्रसिद्ध कविता सादर करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांच्यासह कोकण दर्शन डिजिटल मीडियाचे संपादक आनंद धोंड व व्हिडिओ जर्नालिस्ट आशिष धोंड यांचाही सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात आपल्या कलेचे सादरीकरण केले. वेदिका राऊळ, सृष्टी जाधव आणि त्यांच्या संचाने ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत सादर करून वातावरण भारावून टाकले. रेश्मा पालव, किरण आकेरकर, भावना माळकर, साईश सावंत आणि आदेश खानोलकर या विद्यार्थ्यांनी आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीतून मराठी भाषेचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष पाथरवट यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. मिलिंद कासार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रज्वला कुबल यांनी केले.

Exit mobile version