सावंतवाडी, दि.२८: बांदा शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि चोऱ्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाढलेल्या भिकाऱ्यांच्या प्रमाणावर निर्बंध आणावेत आणि सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी बांदा भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने त्यांना सुरक्षेबाबतचे सविस्तर निवेदन सादर केले.
शहरातील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या अज्ञात व्यक्तींमुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या संशयास्पद व्यक्तींना तिथून तात्काळ हटवण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच, शहरातील बंद अवस्थेत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करावेत आणि मोक्याच्या ठिकाणी नवीन सीसीटीव्ही बसवण्यात यावेत, अशी आग्रही विनंतीही करण्यात आली. यासोबतच, सोमवारच्या आठवडा बाजारात पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढवावी आणि गावातील वाड्या-वस्त्यांमध्ये फिरणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांवर कडक निर्बंध आणून त्यांची चौकशी करावी, असेही भाजप पदाधिकाऱ्यांनी सुचवले.
या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या सहकार्याने उड्डाणपुलाखालील अतिक्रमण हटवण्याचे आश्वासन दिले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे आधीच मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, शहरातील सुरक्षेसाठी रात्रीची गस्त आणि सोमवारच्या आठवडा बाजारात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजपचे बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, उपसरपंच रत्नाकर आगलावे, देवस्थान कमिटी अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळू सावंत, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब, राजाराम उर्फ आबा धारगळकर, शहराध्यक्ष बाबा काणेकर, निलेश नाटेकर, शैलेश केसरकर, सुनील धामापूरकर यांसह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

