जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
ओरोस,दि.२४: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य आर्थिक आधारस्तंभ असलेल्या आंबा आणि काजू पिकावर यंदा अस्मानी संकट ओढवले आहे. अचानक झालेल्या हवामानातील बदलामुळे आणि अवकाळी पावसामुळे चालू हंगामातील फळधारणेला मोठा धोका निर्माण झाला असून, या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मा. श्री. मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोंडमिसे यांना सविस्तर निवेदन सादर केले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अचानक झालेल्या हवामानातील बदल आणि अवकाळी पावसामुळे झाडांवर सध्या शिल्लक असलेली फळे मोठ्या प्रमाणावर गळून पडणार असून बागायतदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. या संदर्भात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. २३ तारखेपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असून, बदललेल्या वातावरणाबाबत आणि अवकाळी पावसाच्या नुकसानीबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला तातडीने सादर करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
तसेच, तांत्रिक अडचणींमुळे ज्या शेतकऱ्यांची पीकपाणी नोंद ऑनलाईन झालेली नाही, त्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही नोंद ऑफलाईन पद्धतीने करून घेण्याचे आदेश संबंधित तलाठ्यांना तातडीने द्यावेत, अशी विनंतीही या निवेदनाद्वारे करण्यात आली. या शिष्टमंडळात जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह वेंगुर्ला माजी पंचायत समिती सभापती जयप्रकाश चमनकर, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, प्रकाश बोवलेकर, श्यामसुंदर राय व वेंगुर्ला तालुक्यातील प्रतिष्ठित व्यापारी आणि बागायतदार उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेतल्यास संकटात सापडलेल्या फळ बागायतदारांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

